Tuesday, December 25, 2012

बढती का नाम दाढी !

सकाळी सकाळी दाढी करणे हा एक वैतागवाणा प्रकार आहे. सदर कारणास्तव आपले अनेक मित्र दाढी राखून आहेत. मीही कॉलेजात असताना ही आवड जोपासली होती. त्या काळात मला ' दाढीवाला ' म्हणून ओळखले जात असे; तर ते असो. दाढी अलीकडे पूर्वीपेक्षा बरीचशी सहजपणे करता येण्यासारखी गोष्ट झाली आहे. कारण विविध म्याच थ्री सारखी शार्प ब्लेड्स आज उपलब्ध आहेत. कॉलेजला असताना केलेली पहिलीवहिली दाढी आणि त्यातील थ्रील अजून आठवते. तेव्हा ट्विन ब्लेड्स वापरणे म्हणजे चेहऱ्याचे फारच लाड करण्यासारखे होते. म्हणून आम्ही मित्र पारंपारिक फावडे आणि विल्किन्सनचे ब्लेड वापरत असू. कधी कधी दोन तीन मित्र एका ब्लेडमध्ये शेअरिंग करून सामुदायिकरित्या दाढी करायचो. त्यासाठी लागणारे क्रीम, आफ्टरशेव लोशन आणि ब्रश हा एकच सर्वांसाठी पुरेसा असे. कारण तेव्हा एड्स सारखे आजार अजून एवढे पसरलेले नव्हते. आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या मित्रांना तो तसा असण्याची शक्यता निदान तेव्हा तरी नव्हती. सुरुवातीला सवय नसल्यामुळे हमखास रक्त येई.

नंतर सवयीने दाढी जमू लागली. त्यातही नंतर ब्लेडची एक कडा जास्त शार्प असते , आणि त्यातूनही पुन्हा त्या कडेची एक बाजू दुसरीपेक्षा अधिक शार्प असते, असे लक्षात आले. तीक्ष्ण कडा ओळखण्याची दृष्टी आली. पण अनेकदा घाईगर्दीत चेहऱ्याला जखम होईच. नंतर ट्विन ब्लेड्स वापरू लागलो. हे जरा बरे होते. थोडा कमी त्रासदायक होते. आणि एक ब्लेड महिनाभर सहज पुरत असे. पण होस्टेलवर सदर गोष्टी चोरीस जाण्यास पात्र ठरत. त्यामुळे त्या पुन्हा पुनः आणाव्या लागत.

परीक्षेचा आणि प्रेमभंगाचा कालावधी हा दाढी वाढण्यास उपयुक्त काळ असायचा. परीक्षक आणि पोरी ते 'समजून' घेत असत. एकदा पाच सात दिवस विनाकारण दाढी वाढली. सहज आरशात पाहिले असता लक्ष्यात आले, की आपल्याला दाढी बरी दिसेल. मग तेथून फ्रेंच कट दाढी ठेवायला सुरुवात केली. या दाढीची बरीच निगा घ्यावी लागते आणि नियमित त्याला तज्ञ न्हाव्याकडूनच कट मारावा लागतो , अन्यथा ती तुम्हाला 'पाहणाऱ्या' मुलींना हास्यास्पद वाटू शकते.यापेक्षा सरळसोट दाढी वाढवणे सर्वात सोपे ! मी इंटर्न असताना हा प्रकार सुद्धा नंतर मी अवगत करून घेतला. पण तो माझ्या चेहऱ्याला तेवढासा सुट होत नाही, असे काही तज्ञ लोकांनी सांगीतले. मग आता काय करावे असा विचार चालू असतानाच कॉलेजात एकदम सफाचट दाढी (मिश्या सुद्धा ) काढून टाकण्याची लाट आली. आणि माझ्या दाढीला निमित्त मिळाले.


त्याचे असे झाले निकम नावाचा एक चेनस्मोकर मित्र होता (म्हणजे अजून आहे तो ! :-) . तर याचे एका मित्राशी भांडण झाले. आणि त्या दुसऱ्या मित्राने याची मिशी झोपेतच उडवून टाकली. मग याने त्या पहिल्याची मिशी उडवली. आणि तिथून ही लागण सर्वत्र म्हणजे अख्ख्या कॉलेजात पसरत गेली. दोन पाच मित्रांचा घोळका दिसला की हे आता आपल्याला पकडून मिशी अर्धी उडवणार, अशी भिती वाटायची. म्हणून मी कोलेजला जाणे सुद्धा कमी करून टाकले. त्यावेळी मी शहरातील एका नामांकित सर्जनकडे प्रक्टिस करत होतो. हा बाबा खरेच चांगला सर्जन होता, पण हा ओ.टी. मध्ये फार आरडाओरडा करायचा. याला मी ऑपरेटीवला असिस्ट करायचो, बरेचदा हा बाबा एखादी छोटी आर्टरी अशा प्रकारे कापायचा की थेट फवारा उडत असे. पुन्हा स्वतःकडून आर्टरी कापली गेली म्हणून माझ्यावर वैतागायचा आणि आरडाओरडा करायचा. कधी कधी हातातील इन्स्ट्रुमेंटस सरळ वाटेल त्या दिशेला फेकून द्यायचा. मी म्हणायचो " मी बाहेर जाऊ का ?"
" शाब्बास ! मला असिस्ट तुझा आजा करणार का ?"
" पण तुम्ही स्वतःच्या चुकांसाठी दुसऱ्या लोकांना दोषी का समजता ?"

" ठीक आहे ! कौटरी घे पटकन ; फोर्सेप्स नीट पकड !"


प्रोसिजर संपल्यावर हाच बाबा पाठीवर हात ठेवून म्हणायचा
" अरे यार, मी टेन्शनमध्ये असतो ओटीत. तिथलं माझं बोलणं मनावर घेत जाऊ नकोस !"
हा मला लाभलेल्या काही गुरुंपैकी एक चांगला मनुष्य ! इतर वेळी हा अवांतर विषयांवर ,अगदी अध्यात्मावर चर्चा करायचा.याला वाचायचा कंटाळा असावा, कारण ह्याने तेव्हा माझ्याकडून 'लव्ह एन्ड बेली' वाचून घेतले. म्हणजे मी वाचायचो आणि तो ऐकायचा !

तर आता मूळ विषयाकडे वळतो. माझ्या या गुरूला दाढीमिशा नव्हत्या. पण तरुणांनी दाढी किमान मिशी तर राखावीच, असा याचा आग्रह असायचा. मिशीशिवाय मनुष्य म्हणजे अगदीच ' हे ' वाटतो असे याचे म्हणणे होते.
" सर, तुम्ही मिशी का ठेवत नाही?" असे मी घाबरत विचारल्यावर तो म्हणायचा
" मी आता म्हातारा झालो !"
 हे सर्व अवांतर सांगण्याचे कारण असे की एकदा दुपारच्या वेळात मित्रांचा ताफा आयुधांनिशी माझ्याकडे धावून आला. मी नुकताच जेवण करून बेडवर लेटलो होतो. दोघांनी मला पकडून ठेवले आणि एकाने हलकेच कुठल्यातरी ऑपरेशन थिएटरमधून चोरून आणलेल्या तीक्ष्ण कात्रीने माझ्या मिशीचा अर्धा भाग उडवला. आणि तत्काळ पळून गेले.
" अरे साल्यांनो, निदान पूर्ण तरी कापा !"
" तुझी तू कापून घे, आम्ही काय हजाम वाटलो कायबे ए येड्या ? "
" फुल्याफुल्यांनो , थांबा पळता काय हरामखोरांनो ?"
पण मित्र थांबले नाहीतच. मी चेहऱ्याचा अर्धा भाग झाकून नर्सला हाक मारली
" मला जरा सर्जिकल ब्लेड आणून दया एक "
" कशासाठी हवेय डॉक्टर ?"
" असेच पाहिजे, सहज !"
" किती नंबरचे देऊ ?"
" कितीपण नंबरचे द्याहो, लवकर दया जरा !"
" चेहऱ्याला काय झाले का डॉक ?"
" काहीच नाही झालेहो, ब्लेड देता ना ?"
तीने ब्लेड आणून दिले. मी वर माझ्या रुममध्ये आलो आणि उरलेल्या अर्ध्या मिशीवर निर्दयपणे ब्लेड फिरवले !


 पण आता अजून दाढी बाकी होती. अनेक महिन्यांत काम पडले नाही, म्हणून रेझर आणि ब्लेड्स आणण्याची गरज भासली नव्हती. आता मिशीशिवाय दाढी हे फारच विचित्र दिसत होते. मी जवळच्या सलूनमध्ये धावतच गेलो.
" सलाम वालेकुम !"
" वालेकुम अस्सलाम ! दाढी करायची आहे. "
" अच्छा, अच्छा, आप बैठीये. सिर्फ पांच मिनिट !"
" थोडे लवकर नाही का जमणार, जरा घाईत आहे !"
" ये क्या, इनकी दाढी हो गयी की बस आपही का नंबर है !"
हा मराठी मनुष्य मी त्याचेशी मराठीत बोलत असूनही माझ्याशी हिंदीत का बोलत होता,कळेना  ! एकदाचा माझा नंबर आला.
" कट मारनेका है क्या ?"
" पूर्ण उडवायची आहे."
" ठीक है, यह तो बहुत आसान है, हमारे लिये ! दाढी जितनी बडी उतना इझी होती है ! क्युंकी बाल काफी सोफ्ट होते है !"
मोजून पाच मिनिटांत त्याने माझ्या दाढीचा बळी दिला.

माझा हा अवतार माझ्यासाठी नवीन होता. सुरुवातीला समोरच्या आरशातील मनुष्य मीच आहे, की काय ओळखू येत नव्हते. तसाच हॉस्पिटलला धावत आलो.स्टाफस , आया , वार्ड बोइज सारेच हसले. त्यांनी पुरेसे हसून घ्यावे म्हणून तिथेच निर्विकारपणे थांबलो.
" हाहाहाहा ,छान दिसताय डॉक्टर  !" एक स्टाफ म्हणाली.

" धन्यवाद, आलोच मी !"
" हीहीहीही !"
"तुमचे हसून झाले असेल तर मी येतो आता, थोडा आराम करतो !"
" ओके सर, पण तुम्ही फार वेगळे दिसता आज !"
" वेगळा म्हणजे ? "
" काही नाही. सर आले की कोल करते.तुम्ही आराम करा. "
मी माझ्या रुममध्ये येऊन झोपी गेलो.
संध्याकाळी पाचला मोबाईलची रिंग वाजली
" सर आलेत "
" आलोच मी !"
मी फ्रेश होऊन खाली गेलो. ओपीडीत.
" गुड इव्हिनिंग सर !"
" कोण ? गुड इव्हिनिंग !"
" सर.."
" अर्र्रर्र्रर्र्र ,अरे हे काय केलेस तू ? "
" सर माझ्या मित्रांनी माझ्या मिशा उडवल्या मग मला दाढी करणे भाग होते !"
" काय बिनडोक मित्र आहेत तुझे ? आणि तू सुद्धा किती मूर्ख, त्यांना खुशाल मिश्या कापू दिल्यास !"
" सर मी नाही कापू दिल्या.."   मग मी सरांना घडला तो संपूर्ण किस्सा सांगितला.
" पण हे काही बरोबर नाही गड्या, तू अगदी निव्वळ हे दिसत आहेस ! जा माझ्यासमोर येऊ नकोस !"
" सर, पण माझा काय दोष आहे त्यात ?"
" कसली टुकार पोरं आहात रे तुम्ही ?ते तुझे मित्र आले की सांग मला ."
" ओके सर. "
" आणि तू आता निदान दोन तास तरी माझ्यासमोर येऊ नकोस !"
" ओके सर. मी फिरून येतो मग जरा !"
" शाब्बास, म्हणजे इकडे काही इमर्जन्सी आली, की तुला शोधत बसायचं का आम्ही ? इथेच बाहेर थांब पण मला थोबाड दिसू देऊ नकोस !"
क्षणभर वाटलं, "च्यायला काय हा विक्षिप्त मनुष्य आहे ! "पण दुसऱ्याच क्षणी गुरूविषयी असे विचार चुकीचे आहेत, हे जाणवून मी मित्रांना मनातल्या मनात अनेक शिव्या घातल्या.
सदर प्रकारानंतर माझे इतर दोन मित्र पोरे आणि भूषण मला भेटायला आले. त्यावेळी सर पेशंटस आटोपून ओपीडीत वाचत बसलेले होते.
" अरे, स्वागत मित्रहो, खूप दिवसांनी इकडे ?"
" चल चहा मागव !"
" होरे, च्यायला बसा तर खरं !"
" बाहेरच जाऊ चल. तुझा तो डेंजर बोस गेला का घरी !"
" ओपीडीत बसलाय बाबा !"
" च्यामायला जाकी म्हणावं घरी; जेवण बिवन कर म्हणा घरी जाऊन !"
" हळू बोलरे, च्यायला ऐकलं सरांनी, तर तुम्हाला दोघांना हाकलून देईल !"
" दाढीमिशीवरून लई छळलं म्हणे तुला ?"
" जाऊदेरे आपली पोरेच साली टपोरी आहेत !"
  बॉसला आमच्या बोलण्याची चाहूल लागली की काय, पण तो बाहेर आला.
" अच्छा, हे मित्र का तुझे ?"
" हो सर, ओळख करून देतो - हा पोरे आणि हा भूषण !"
" नमस्कार सर !"

" नमस्कार !"
" तुम्हाला काही अक्कल बिक्क्ल आहे की नाहीरे ?" बॉसने थेट मुद्याला हात घातला
 " छेछे, सर हे अतिशय चांगले , गुणी मित्र आहेत !"
" तू मध्ये बोलू नकोस !"
" सर, पण आम्ही याच्या दाढी मिशांशी काही कर्तव्य नाही. आम्ही कशाला उडवू ? ते दुसरे मित्र होते."
" मला तर तुम्ही पण तसेच भामटे वाटता !"

" तुम्हाला वाटते त्याला आम्ही काय करणार ?"
यानंतर माझ्या ने बॉसने मित्रांची अशा प्रकारे चांगली पंधरा मिनिटे बिनपाण्याने केली. मित्र वैतागून अक्षरश: कोपरापासून नमस्कार करून निघून गेले ! बॉस सुद्धा घरी निघून गेला. मी मित्रांच्या मागे धावत गेलो.
" माफ करा मित्रहो, माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला..चला ,चहा तरी घेऊ !"
" अबे जा तिकडे !  फुकट पण नको तुझा चहा ! च्यामायला , आम्हाला चहा प्यायचा म्हणून येतोक्काय आम्ही हिकडं ? "
" ए सुन्या, त्या तुझ्या बॉसला समजावून सांग जरा, कोणालापण काहीपण बोलत जाऊ नकोस म्हणा, च्यामायला ! तुझा बॉस म्हणून सोडून दिला त्याला. तुला काय अशे तशे वाटलो काय म्हणा,काबे येड्या !"
" जाऊदे यार गुरु आहे. "
" तुझा असेल गुरु आमचा नाही, चल जातो आम्ही !"


यानंतर माझ्या बॉसने २-३  दिवस माझा जो छळ मांडला तो अवर्णनीय आहे. ओटीत असताना हा बाबा बाहेरून आलेल्या सर्जन्स आणि अनेस्थेतिस्त लोकांना म्हणत असे
" बघा आमच्या डॉक्टरांनी काय केले आहे ! डॉक्टर, मास्क काढ बर !"
" सर, आता त्यात काय एवढे ?"
" नाही, दाखव थोबाड जरा !"

किमान दहा वेळा तरी मी मास्क काढून चेहरा दाखवला असेल. मी नाईलाजाने मास्क काढला की मग ते लोक मला हसत आणि हा बाबा माझा आणि माझ्या मित्रांचा उद्धार करत असे. त्यातील एखादा सरांच्या अपरोक्ष सांत्वन करून जाई :
" रिल्याकस, सरांचे फार मनावर घेऊ नकोस ! या वयात एवढं चालायचंच ! पण तुला दाढीच चांगली वाटते; पुन्हा वाढव. बढती का नाम दाढी !"

चार पाच दिवसांनी पुन्हा दाढीचे खुंट दिसायला लागले आणि मी दाढी जोमाने वाढवण्याचा निश्चय केला; ती वाढवली सुद्धा ! पण नंतर मला तो माझा प्रिय छंद काही कारणाने सोडून द्यावा लागला. त्याची कथा नंतर केव्हातरी !  :-)

Thursday, November 15, 2012

ब्ल्याक होल

ब्ल्याक होल

by डॉ.सुनील अहिरराव on Friday, November 16, 2012 at 12:35am ·

आपण जात आहोत त्या रस्त्यावरून हजारो, लाखो, करोडो लोक गेले असतील कधी समांतर , कधी वेडेवाकडे, कधी रस्त्यांना छेदत. ते आज इथे नाहीत पण मी पाहतो आहे, त्यांच्या पाउलखुणांच्या रेषा : एकमेकांत इतक्या रुतलेल्या घट्ट , एकसंध, एकजीव ! किंवा वेगवेगळ्या धातूंचे असंख्य तुकडे वितळवून घडवलेला अजस्त्र घण ! आणि त्यात प्रत्येक कणाचे सूक्ष्म अस्तित्व अजून तसेच. प्रत्येक घावागणिक कितीक माणसांच्या आठवणी आणि त्यांच्या भावना प्रेम, आनंद, दु:ख ,वासना, विखार आणि कुठले कुठले अंदाजापलीकडच्या अनंत विचारांचे वेडेवाकडे लोह्तप्त गुंते ! तो अजून वाहतोच आहे प्रचंड गर्दी उरात साठवून आणि लोक पुन्हा त्यावरून तसेच जात आहेत,आपापल्या भावना, विचार, खुणा अजाणतेपणी पेरून. याच रस्त्यावरून कितीक लोकांचे अनेकदा प्रवास झालेले, आपल्याच खुणांविषयी अनभिज्ञ लोक आणखी काही रेषा इथे सोडून जातात पुन्हा पुन्हा... त्यात मीही एक !

इथेच कैकदा उधळलेला गुलाल आणि विरून गेलेल्या मिरवणूका. .. कधी अल्लड प्रेमी हातात हात घालून हितगुज करीत गेलेले. कधी धावत्या गाडीत विनयभंग आणि बलात्कार सुद्धा ! असंख्य वाहने , असंख्य अपघात आणि सांडलेले रक्त..सरून गेलेल्या अंत्ययात्रा...या सगळ्यांचा एकसंध गठ्ठा गिळंकृत करणारा रस्ता ब्ल्याक होल सारखा भासतो आहे !

Tuesday, September 25, 2012

क्षण कोसळते ...

क्षण कोसळते...
by डॉ.सुनील अहिरराव on Wednesday, August 15, 2012

कोण कुठल्या क्षणांचे क्षणाक्षणाला बदलणारे अनंत संदर्भ मेंदूत भरून जगत असतो आपण ! कुठून कसा ,कुठला क्षण कालौघातून ओघळेल आणि कोसळेल आपल्यावर, सांगता येत नाही. त्या क्षणाच्या कोसळण्यावर आपल्या अस्तित्वाचा डोलारा उभा असतो. तो कोसळेपर्यंत वाट पाहणे इतकेच आपल्या हाती... इथेच आशा नव्याने जन्म घेत जाते. त्या येणाऱ्या क्षणात कदाचित असणार असतो आपले कोसळते अस्तित्व सांभाळणारा एक दीपस्तंभ ! मात्र एक निश्चित की त्या त्या क्षणांना आपण रोखू शकत नाही. .पुन्हा नव्या संदर्भांचे ओझे घेऊन एक प्रवास सुरु राहतो ... त्या त्या क्षणांच्या कोसळण्याची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती ! त्याने जे दान तुम्हाला दिले ,ते निमुटपणे स्वीकारण्याशिवाय पर्याय तरी कोणता ?

सुखाला जसे विविध रंग असतात, तसेच दु:खाच्याही अनंत छटा... ! प्रत्येकाचं दु:ख मोठं आणि परद:ख शीतलं ..आपल्या दु:खाला श्रोता मिळू शकतो पण आपल्या स्वतःशिवाय दुसरा सोबती मिळत नाही. ती तीव्रता आपली आपण भोगायची : कधी सुन्न,बधीर व्हायचं; कधी हुंदके देऊन रडायचं, कधी निगरगट्टपणे कोरडेपणाने आपल्याच दु:खावर भीषण हसायचं ! आपल्या इवल्या डोळ्यांइतकच आपलं आकाश...त्यात जमतील तशा वेड्यावाकड्या रेषा आखायच्या. काही आकृत्या ,चित्रे रेखाटायची..ती सुद्धा अंगावर धावून येणारी..त्याच एब्स्ट्राक्ट आकारांत हरवून जायचं आणि त्याच त्या रेषांच्या रिंगणात फिरत रहायचं दरक्षणी कोसळत्या नव्या क्षणाच्या प्रतीक्षेत ! सगळंच म्हटलं तर आखीवरेखीव म्हटलं तर सगळंच विस्कळीत ...

असे असंख्य गुंते आणि त्यांची वेडीवाकडी भेंडोळी जमा करत चाललो आहोत आपण. कधी सुटलेच गुंते तर - वरवरचे वाटतात सुटल्यासारखे ; बहुधा हे सुद्धा तितकेसे खरे नाहीच ! एक धागा उकलताना नकळत त्याचा एक नवा गुंता ,एक नवे भेंडोळे तयार होते. आयुष्य म्हणजे साऱ्या क्षणांच्या संदर्भाचं एक मोठं भेंडोळं आणि आपण त्यात अडकलेले क्षुद्र जीव. अचानक हे धागे कधी स्वतःच उकलले जातातही ... क्षणांचे, वर्षांचे संदर्भ उलटून गेल्यावर नामोनिशाणही उरत नाही. ही उकल होण्यासाठी पुन्हा त्या क्षणाच्या कोसळण्याची वाट पाहणे ; मात्र ती तशी होणे न होणे त्या त्या क्षणावर अवलंबून... ! त्या क्षणाच्या बरसल्यानंतरचा प्रतिक्रियेचा क्षण तरी आपला असतो का, प्रश्नच आहे कारण एखादा क्षण कोसळताना मिटवून जातो आपलं असणं, तेव्हा पुढचा क्षण वाट्याला येत नाहीच...मग एक अनंत प्रवास अपरिहार्यपणे...
- डॉ. सुनील अहिरराव

Friday, February 24, 2012

आपली कागदी संस्कृती

आपण जन्माला येताना काय सोबत आणतो?                            
प्रश्न तसा साधाच पण उत्तर कठीण आहे.कुणी म्हणतील भाग्य,कुणी म्हणतील प्राक्तन,कुणी म्हणेल मन वगैरे वगैरे.उत्तरं सापेक्ष असणार,हे खरेच आहे.पण आपल्या सध्याच्या संस्कृतीबद्दल बोलावयाचे झाल्यास मी म्ह्णेन की आपण जन्माला येताना 'कागद' घेऊन येतो! होय,birth certificate नावाचा कागदाचा एक तुकडा! अन् येथूनच आपलं कागदी आयुष्य सुरु होतं. हा कागद तुम्हाला तुम्ही एकदाचे जन्माला आलेले आहात हे बजावतो! तुमच्याजवळ हा कागद नसेल तर मग तुमचं काही खर नाही कारण तुम्ही जरी समोर जिवंत दिसत असलात तरी त्याला पुरावा काय बाबा? मग सारचं अडत जात.तुम्हाला बालवाडीत किंवा नर्सरीत प्रवेश मिळत नाही.मग तुमचे आईवडील बिचारे कोणत्यातरी डॉक्टरचं तुमच्या जन्माचं खोटं सर्टीफिकेट आणतात.ते घेऊन तलाठी वा म्युनिसिपल कार्यालयात लाच देऊन खोटा जन्मदाखला घेतात.अश्याप्रकारे एकदाचे तुम्ही बालवाडीत वा तत्सम 'शाळेत' जाता.मग वर्षभर कागदांचा खेळ चालतो-त्यात तुमच्या वडिलांचा उत्पन्नाचा दाखला,त्यांचा जातीचा दाखला,त्यांचा रहिवासाचा पुरावा क्वचित वेळा तुमच्या वडिलांचा विवाहदाखला सुद्धा मागितला जातो.दरवर्षी तुम्ही पास झाल्याचा एक कागद मिळवून वरच्या वर्गात जाता आणि तुमचा कागदांचा संग्रह वाढत जातो. तुमच्याजवळ जेवढे जास्त कागद,तेवढे तुम्ही great!एकदाचे तुम्ही १२ वी वगैरे झालात की मग तर कागदांचा भला मोठा पेटाराच तयार होतो.त्यात खरे खोटे मात्र सारे अधिकृत कागद असतात आणि हे फक्त तुम्हाला किंवा तुम्ही ज्या ठिकाणच्या ज्या सरकारी वा खाजगी अधिकाऱ्याकडून मिळवलेले असेल ,त्यालाच माहित असतात.नंतर असंख्य कागदांचा अभ्यास करून तुम्ही एखाद्या ठिकाणी कागदी नोटा देऊन नोकरीला चिकटता.आणि आयुष्यभर कागदावर कागद जमा करत राहता! नंतर तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्हाला तीच कागदांची उठाठेव करत राहता.तुम्ही तुमच्या आजोबांचा जन्मदाखला सुद्धा मिळवता,कारण आता तुम्ही बरेच अनुभवी असता.कोठून काय आणि कसे मिळते,हे तुम्हाला आता चांगलेच माहित झालेले असते.स्वतःच्या आजारपणाचा खोटा दाखला देऊन तुम्ही वैद्यकीय रजा आणि बिल सुद्धा मिळवता,आणि त्या रजेच्या कालावधीत मस्त कुटुंबासोबत फिरून बिरून येता !

खाजगी वा सरकारी कार्यालय कोणतेही असो.लाच दिल्याशिवाय तुमचे काम नाहीच होत! शाळेत जुन्या मास्तरांनी शिकवलेले धडे चोरी करू नये,खोटे बोलू नये,सर्व बंधू समभाव ,अडचणीतल्या मित्रास मदत करावी वगैरे आपण हळूहळू विसरत जातो.श्यामची आई वाचून हुंदके देऊन कधीकाळी रडणारे आपण आज अगदी निगरगट्ट झालो आहोत.स्वातंत्र्यासाठी बलीदान देणाऱ्या वीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढायचे आपल्याला. ते आपण थंड रक्ताचे झालो आहोत.आपण स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली वाहतो,तेव्हा आपलं लक्ष त्या त्या वीरांच्या वा प्रतिमेकडे कमी आणि फोटोग्राफरकडे जास्त असतं.काही सुशिक्षीत सुसंस्कृत महाभाग तर शाळेत मुलांना सोडायला जाताना राष्ट्रगीत सुरु असेल तरीही कुणाशीतरी मोबाईलवर बोलताना आढळतात.किंवा त्यांची एखाद्या समकक्ष सहकाऱ्याशी चर्चा चाललेली असते-त्यांचे विषय असतात-'सहाव्या वेतन आयोगाच्या  फरक इतका मिळाला.वेतनश्रेणी ही मिळाली ,शेयर्समध्ये किती गुंतवले,इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी पॉलिसी घेतली वगैरे वगैरे..किती संकुचित झालो आहोत आपण! रोज भ्रष्टाचाराचा एक नवीन धडा आपण अंगी बाणवत चाललेलो आहोत.कुणाचे होवो न होवो,आपले काम आपल्याला करून हवे असते.त्यासाठी लाच द्यायला आपण सतत तयार असतो.आणि घेणारेही.

या देशात बोगस रेशनकार्ड २०० रुपयात आणि एका दिवसात मिळते.पण प्रामाणिकपणे मिळवायला जाल तर किती दिवस,महिने  किंवा वर्षेपर्यंत थांबावं लागेल,सांगता येत नाही.'उद्या या,आठवड्याने या,कार्ड शिल्लक नाहीत,त्या अमक्याला भेटा,पुढ्च्या महिन्यात या' अशी उत्तरे मिळणार!अश्या प्रकारे दहा चकरा मारल्यानं वैतागून तुम्ही त्या ऑफिसात जाणेच बंद करून टाकता.या  देशात एकवेळ पासपोर्ट लगेचच मिळतो,पण सर्वसामान्यांना आवश्यक रेशनकार्ड मात्र मिळत नाही.हे सामान्य माणसाचं आणि ज्या देशात तो राहतो,त्या भारत देशाचं मोठं दुर्दैव आहे.अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी आणि गरज म्हणून आपण लाच द्यायला सुरुवात करतो का?कदाचित
होय! पूर्वी चकरा मारून मारून आपण लाच द्यायला उद्युक्त होत होतो.आता काम आणखीच सोपे झाले आहे.आता लाचेचे रेट्स ठरलेले आहेत.तेवढे पैसे 'थ्रो प्रॉपर च्यानेल' दिलेत की बाबू लोक तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे घरपोच देतात.ज्यांना हे जमत नाही,त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.डार्विनच्या सिद्धांतानुसार तुम्ही आपल्या कागदी संस्कृतीत जगण्यास नालायक ठरता.

जग झपाट्याने बदलत आहे. पत्राची जागा १२ -१५ वर्षांपूर्वीच मोबाईलने घेतली आहे.कागदपत्रांची देवाणघेवाण फ्याक्स,इमेल्सनी केली जात  आहे.व्हिडीओ कॉन्फरनसिंग, लाइव चाट,वगैरे प्रकार आपल्यासाठी नेहमीचे गरजेचे झाले आहेत.विदेशात सर्व सरकारी कार्यालयांतून अश्या माध्यमांचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे.भारतातही आता व्यवहार ऑनलाईन होऊ लागले आहेत.आणि खाजगी कार्यालयांमधून त्याचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला जात आहे.मात्र सरकारी कार्यालयांच काय? या सर्व सुविधा असूनही कामाला गती का मिळत नाही?कारण एकच आहे-आणि ते म्हणजे आपण आपल्या कागदी संस्कृतीत अडकून पडलो आहोत. आजपर्यंत किती लोकांनी ७-१२ चा उतारा ऑनलाईन मिळवला आहे?काही मोजक्या सरकारी बँका सोडल्यास इतर कार्यालयांच्या ठिकाणी तुमची निराशाच होणार!न्यायालयांचे उदा.घेऊ.प्रत्येक कोर्टात इंटरनेट,फ्याक्स इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.त्यांचा वापर केला जातो का? केला जात असल्यास केवळ अपवादानेच.  आरोपीला समन्स बजावताना कोर्टाच्या सही-शिक्क्यासह असलेले बंद पाकीट लागते.त्याशिवाय पोलीस ते बजावत नाहीत. कोर्टाने त्या त्या पोलीस स्टेशनला तसा फ्याक्स किंवा इमेल पाठवला तर?आणि आरोपीच्या  मोबाईल,ईमेल आयडीवर सरळ सम्पर्क साधला तर काय होईल? तो पळून पळून कुठे जाणार? तुम्हाला त्याच्या मोबाईलचे लोकेशन काही सेकंदात समजू शकते.मात्र त्यासाठी  संबंधित कर्मचाऱ्याना  या सर्व गोष्टींचे ज्ञान असायला हवे.असे ज्ञान असूनही किती लोक त्याचा वापर करतात?आजची न्यायालयांची परिस्थिती फार वाईट आहे;असे नाईलाजाने म्हणावे लागते.किती जणांना न्याय मिळतो?आणि किती जणांना 'पुढची तारीख ' मिळते? हे सर्व कशामुळे घडते?
फक्त कागदी घोडे नाचवणाऱ्या यंत्रणेमुळे;आपल्या कागदी संस्कृतीमुळे!



Tuesday, June 14, 2011

धर्म: एक दिशाहीन प्रवास

      धर्म या शब्दाची व्युत्पत्ती धृ या धातु पासून झालेली आहे.वेगवेगळ्या ग्रंथांत याच्या विविध व्याख्या दिलेल्या आहेत. 'धारणात धर्म इत्यार्हु धर्मो धारयाती प्रजा: '(महाभारत)

ज्यामुळे समाजाचे धारण केले जाते,किंवा प्रजेला जो धारण करतो तो धर्म .इथे धारण शब्दाचा अर्थ धरून ठेवणे,जोडून ठेवणे,बांधून ठेवणे असा घेता येईल.

'जगत स्थितिकारणम् प्राणिनां साक्षात अभ्युदयानि श्रेयस हेतुर्थ: स् धर्म:!' (शंकराचार्य)

जगताची वा विशिष्ट समुदायाच्या स्थितीचे कारण आणि आणि सर्व प्राणीमात्रांच्या अभ्युद्याच्यासाठी धर्म आहे.स्थिती म्हणजे ढळू न देणे ,स्थिर ठेवणे ,मेंटेन करणे.

'यस्मातधारयते सर्व त्रैलोक्यं सचराचरम्' जो संपूर्ण त्रैलोक्याला,चराचराला धारण करतो तो धर्म !

या व्याख्या अलीकडच्या म्हणजे महाभारत कालापासूनच्या आहेत.या काळापासून आजपर्यंतचा विचार करता त्या कितपत योग्य आहेत,याचाही विचार आपण करणार आहोतच. धर्म ही एक नियमावली असते त्या त्या समुहाने,संघटनेने आपसात कसे आचरण ठेवावे, कसे वागावे याचे नियम लिखीत वा अलिखित स्वरुपात असतात. आज जगात क्रिश्चन,मुस्लीम,हिंदू ,बौध्द, जैन, ज्यू असे प्रमुख धर्म आहेत. यात ख्रिश्चन धर्माची व्याप्ती सर्वाधिक असून मुस्लीम धर्म दुसऱ्या स्थानावर आहे. हिंदू हा आशियातील सर्वात मोठा धर्म आहे. धर्म कोणताही असो, त्यात काही समान तत्वे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे 'धर्म ' ही संकल्पना हाडामांसाच्या माणसांनी बनवलेली आहे.(नंतर त्या त्या धर्माच्या कर्त्यास ईश्वर,प्रेषित ,दूत वगैरे विशेषणे लावली गेली.).सर्व धर्मांमध्ये चोरी,व्यभिचार,भ्रष्टाचार,असभ्यता या गोष्टी निषिद्ध आणि दंडनीय मानल्या आहेत. ईश्वर ह्या संकल्पनेला जवळपास सर्वच धर्मांनी अधिष्ठान मानले आहे,आणि ईश्वराला न मानणाऱ्यांना नास्तिक म्हटले असून त्याचा निषेध केलेला आहे वा त्यासाठी कठोर शिक्षाही ठोठावल्या आहेत.प्रत्येक धर्मात धर्म स्थापन करणाऱ्यांच्या मृत्यूनंतर अनुयायांच्या विचारातील दुहीमुळे वा इतर कोणत्या कारणाने वेगळे पंथ निर्माण झाले आहेत. काही धर्मांमध्ये तत्कालीन बलिष्ठ धर्मानुयायांनी(?) स्वतःच्या फायद्यासाठी मूळ लिखीत वा अलिखीत संहितेत बदल केले होते.आणि त्याचा फायदा स्वतः,आणि पुढच्या स्वताच्या अनेक पिढ्यांना करून दिला. आणि पुढेही तोच पायंडा चालत रहावा म्हणून धर्मातील निर्बल वर्गावर कठोर बंधने लादण्यात आली. उदा. हिंदू धर्मात चार वर्ण निर्माण झाले .प्रत्येक वर्गासाठी वेगळे नियम होते.क्षुद्र लोकांना एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी इतर वर्गांपेक्षा अधिक कठोर शिक्षा ठोठावली जात असे. स्त्रियांना स्वातंत्र्य जवळपास नव्हतेच.मुस्लीम धर्मात अजूनही स्त्रियांवर अनन्वित अत्याचार पाकिस्तान वा तत्सम कट्टर मुस्लीम राष्ट्रांमध्ये होत आहेत आणि त्या संबंधातील बातम्या आपण रोज पहातो,वाचतो आहोत. अमेरिकेच्या इतिहासातही स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला वगैरे.हे सर्व इथे लिहिण्याचे कारण कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्यासाठी नसून केवळ सत्याचा मागोवा घेण्यासाठी आहे ,हे जाणकारांनी लक्षात घ्यावे.


                वरील सर्व मुद्द्यांवरून धर्माची सोपी व्याख्या करावयाची झाल्यास ती याप्रमाणे करता येईल." धर्म ही त्या त्या समाजापुरती आचारविचार,ईश्वरोपासना, श्रद्धा,अंधश्रद्धा,विधी,( किंवा विधी वा  कर्मकांडविरहीत)  इत्यादींच्या निमित्ताने आणि अंतर्गत विरोधाभास वा मतभिन्नता असूनही समाजाला जोडून ठेवण्यासाठी केलेली समानता ,मानवता आणि नैसर्गीक न्यायावर आधारित नियमावली आणि जीवनपध्दती आहे. ज्यात त्या त्या नियमांचे पालन करणे त्या धर्मातील व्यक्तीस बंधनकारक असते."
आता हे सर्व आजच्या सर्व धर्मांमध्ये तेव्हाच घडू शकेल जेव्हा असे धर्म समानता,मानवता आणि नैसर्गीक न्यायाच्या पायावर उभे असतील. दुर्दैवाने आज असे म्हणावे लागते की असा कोणताही ज्ञात धर्म नाही की ज्यामुळे समाजात रक्तपात झाला नाही.
        

माझ्या मते "धर्म" ही संकल्पना व्यक्ती,समाज,संघटना,देश आणि काल "सापेक्ष" असते. कारण विचार हे व्यक्तीगणिक भिन्न असतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यात' समान' हितकर घटक नसल्यास,जरी त्या धर्मामुळे तो विशिष्ट मानवसमूह काही काळापुरता एकसंध असला,टिकून असला तरी सर्वकाली तो तसा राहणे कदापी शक्य नसते. त्यामुळे धर्म ही संकल्पना त्याच्या व्याख्येनुसार समाजाचे केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच धारण करू शकते.काळानुसार जसजसा समाज प्रगल्भ होत जातो,तसतसे मूळ धर्मसंहितेत बदल अपरिहार्यपणे करावे लागतात.ते तसे न केल्यास तो धर्म अधिक काळ तग धरू शकत नाही. ज्या धर्मात समानता,मानवता,अहिंसा यांचे स्थान डळमळीत असते,त्यात अनेक पंथ,जाती निर्माण होतात आणि अंतर्गत कलहामुळे असा धर्म व त्यांचे अनुयायी काळाच्या ओघात नामशेष होतात!"

मग आजच्या विविध धर्मांचे उद्याचे भवितव्य काय? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. आज आपण धर्म ,पंथ,जाती,समाज आदी मुद्द्यांवरून चाललेला कलह आणि त्याचे दुष्परिणाम पाहतो आणि भोगतो आहोत.आधुनिक जगात अतिरेकी आणि धर्मांध दहशतवादी यांची धर्मावरची पकड घट्ट होते आहे. आणि त्यामुळे इतर धर्माच्या लोकांनाही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल चिंता वाटू लागली आहे. म्हणून त्यांनीही स्वताच्या अस्तित्वासाठी दहशतवादाचा आश्रय घ्यावा का? तर नाही! कारण आपणही तसेच करू लागलो तर अखिल मानवी जमातीलाच संपवण्यासारखे होईल. यावर उपाय आहे आणि तो म्हणजे मानवता धर्माचा पुरस्कार करणे! भारत निधर्मी राष्ट्र आहे. भारत ना केवळ हिंदूंचा,ना मुस्लिमांचा,ना शिखांचा ना जैनांचा ना बौद्धांचा वा आणखी इतर कोणत्या धर्माचा! मानवता हाच आपला धर्म आहे. त्याचे शिक्षण आपल्या पुढच्या पिढीला सुरुवातीपासूनच दिले पाहिजे. आपल्या भारतापुरते बोलायचे झाल्यास भारतीय संविधान ही भारतीय नागरिकांच्या जीवनाची नियमावली आहे ,आपल्या जगण्याची शैली आहे यानुसार प्रत्येक भारतीयाने या नियमांचे पालन केल्यास आणि संविधानालाच आपला धर्म मानल्यास आपल्याइतके सुखी संपन्न राष्ट्र कोणतेच नसेल पण....
....पण हे शक्य नाही कारण आम्ही आमच्या बिनबुडाच्या तथाकथित धर्मिक कल्पनांना चिकटून आहोत.हजारो वर्षांपासून आमच्या धर्मात अनेक  विरोधाभास असूनही आमचा पीळ जात नाही. कारण बलवानांनी दुर्बलांना छळायचे हा इथला लिखित/अलिखित नियम बनला आहे.जो आम्ही आमच्या स्वार्थासाठी सोडायला तयार नाही."असेल भारत कागदोपत्री निधर्मी राष्ट्र- पण आम्ही नाही ना! आम्ही कधी मनात तर कधी उघडपणे जातीधर्माची श्वापदे पाळतो;बोला काय म्हणायचं आहे? आमची सवय आहे ती पिढ्यापिढ्यांची! आमच्या रक्तात भिनत आलेले हे विषारी विखारी संस्कार पिढ्यापिध्यांतून पाझरत आलेले आहेत. असतील आंबेडकर ग्रेट;लिहिली असेल सर्वात मोठी घटना. आम्हाला काय त्याचे? आणि तुम्ही कोण आम्हाला विचारणारे"? अशी अरेरावीची भाषा! ही कोणत्याही धर्मियांची असो,पण अधूनमधून अनुभवाला येतेच ना? 
सर्व  महत्वाच्या धर्मांमध्ये विसंगती आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेऊ-
१)मुस्लीम धर्म (कुराण) :मो.पैगंबरांना गाब्रीयेल या देवदुताने दिलेले हे संदेश आहेत असे मानले जाते. ते एका गुहेत ध्यान करीत तेव्हा त्यांना हे संदेश मिळत.काही लोकांच्या मते कुराण हे 'कॉकटेल ऑफ टेक्स्ट' आहे.कुराणाने म्हटले आहे की अल्ला हाच एक देव आहे.दुसरा कुणी देव नाही.थोडक्यात इथे एकेश्वरवाद आहे.मुस्लिमांमध्ये पैगंबरांच्या मृत्यूनंतर शिया आणि सुन्नी असे दोन पंथ निर्माण झाले.हे निर्माण होण्यामागे धार्मिक विवादापेक्षा पैगंबरांचा वारसा कुणाला मिळावा हा भाग जास्त होता.यात वारसा हक्क मागणारे शिया होते. झैन आणि उब्बय इब्न हे पैगंबरांचे शिष्य होते. त्यांच्याकडे वारसाहकक् आले. तेव्हापासून शिया अन् सुन्नी असा पंथभेद निर्माण झाला.आजमितीस शियांची संख्या १५% तर सुन्नी ८५% आहेत. पात्रीशिया क्रोन आणि मायकेल कुक यांच्या मते ७ व्या शतकापर्यंत कुराणाचे अस्तित्व नव्हते. या संदर्भात अनेक मतभेद आहेत. शहाद(अल्ला हाच देव), सलाली (प्रार्थना),जकात,उपवास,हाजी ही इस्लामची मुलभूत तत्वे आहेत. यात प्रार्थनेच्या संदर्भात शिया आणि सुन्नी यांच्यात मतभेद आहेत.सुन्नींच्या मते दिवसातून ५ वेळा तर शियांच्या मते दिवसातून ३ वेळा प्रार्थना करायला हवी. उपवासाच्या बाबतीत सुन्नींमध्ये रजस्वला स्त्रीला उपवास करण्याची परवानगी नसते.     कुराणात मात्र या संदर्भात प्रतिबंध नाही.
कुराणातील काही आक्षेपार्ह विधाने : 1)स्त्रीने आज्ञाधारकपणे वागावे. असे न  वागल्यास त्या स्त्रीच्या पतीने तिला आधी समजावून सांगावे,नंतर शारीरिक संबंध बंद करावेत आणि नंतर मारहाण(शेवटचा पर्याय) करावी.
2)याशिवाय अल्लाला न मानणाऱ्या लोकांविरुध्द आक्रमण करावे (?धर्मयुद्ध).काहींच्या मते हे मत कुराणातील नसून आपल्या धर्मावर आक्रमण करणाऱ्यांचा प्रतिकार करावा एवढाच त्याचा अर्थ आहे.
3)मुर्तीपुजकांना ते सापडतील तेथे ठार करा.ते शरण आले आणि त्यांनी नमाज कायम केले तर त्यांना सोडून द्या.नि:संशय अल्ला क्षमाशील व दयाळू आहे.
४)मूर्तीपूजक नापाक आहेत. 
५)काफिर हे नि:संशय तुमचे शत्रू आहेत.
६)काफिरांशी लढा द्या.
७)ज्यांनी आमच्या आयतांना नाकारले,त्यांना आम्ही लवकरच जाळून टाकू.
८)जे अल्लाशिवाय दुसऱ्या कुणाची पूजा करतील,ते नरकात जातील.
९)काफिर आणि मुनाफिक तुमचे शत्रू आहेत,त्यांना नरकात पोचवा.
१०)आमच्या आयती नाकारणाऱ्या लोकांचा हा सूड आहे.
११)हे लोकांनो,लढा उभारा.जर तुम्ही २० जण एकत्र आलात तर २०० लोकांवर प्रभुत्व गाजवाल.जर १०० असाल तर १००० काफिरांना भारी आहात.
१२)कपटी आणि काफिर नरकातील आगीत सदैव राहतील.
१३)यहुदी आणि इसाई यांना मित्र करू नका.

१४)आम्ही पुन्हा त्यांच्यामध्ये अखेरच्या दिवसापर्यंत वैमनस्य आणि द्वेषाची ज्वाला पेटवली आहे.आणि ते काय करत होते,हे अल्ला लवकरच त्यांना सांगेल.वगैरे वगैरे.


कोलकाता  कुराणविरोधात  अर्ज :(संदर्भ : v.sundaram रिटायर्ड आय.ए.एस. ऑफिसर)

१९८५ मध्ये कोलकाता हायकोर्टात चंदमल चोप्रा,हिमांशु कुमार ,सीतल सिंग यांनी वरील आक्षेपार्ह मुद्द्यांसंदर्भात  अर्ज दाखल केला .न्या. बिमलचंद्र बसक यांनी तो खारीज केला. यात बरेच राजकारण होते,असे म्हटले जाते. या संदर्भातील रिव्ह्यू पिटीशनही खारीज करण्यात आले.यानंतर १९८६ मध्ये सीताराम गोयल यांनी "दि कोलकाता कुरान पिटीशन" असे एक पुस्तक प्रकाशित केले.त्यात त्यांनी कुराण,व्होट बँक्स आणि राजकारण आदी गोष्टींचा उहापोह केलेला होता.यानंतर लगेचच काही हिंदूंनी कुराणातील २४ आक्षेपार्ह आयतींविषयी पोस्टर्स प्रकाशित केली.आणि भारतात जातीय दंगली उसळण्याचे हे कारण आहे:कारण अशा आयती मुस्लिमांना इतर धर्मियांविषयी द्वेष पसरविण्याचे काम करतात.त्यामुळे त्या कुराणातून काढून टाकल्याशिवाय जातीय दंगली थांबणार नाहीत, असे म्हटले होते.या पोस्टर प्रकारात राजकुमार आर्य आणि इंद्रसेन शर्मा या  दोन लोकांना ना अटक झाली होती.या प्रकरणावर निकाल देताना न्या.लाहोट यांनी म्हटले होते-
'It is found that the Ayats are reproduced in the same form as are translated in the said 'Quran Majeed'. In my opinion the writer by writing the above words has expressed his opinion or suggestion and at the most it can be branded as a fair criticism of what is contained in the holy book of Mohammedans'.. With due regard to the holy book of 'Quran Majeed', a close perusal of the Ayats shows that the same are harmful and teach hatred and are likely to create differences between Mohammedans on one hand and the remaining communities on the other. In view of the above discussion, I am therefore of the view that there is no prima facie case against the accused as offences alleged against the accused do not fall prima facie within the four corners of Sections 153-A/295-A of the Indian Penal Code and hence both of the accused are discharged'

इस्लाममध्ये मूर्तीपूजा हे धर्मविरोधी कृत्य मानले आहे. आता इथे थोडी विसंगती अशी दिसून येते,की मग मशीद,दर्गे वगैरे अल्लाची ठिकाणे कशासाठी बनविण्यात आली? आणि आजचे मुस्लिमधर्मीय जेव्हा एखाद्या मशिदीत प्रार्थना करतात,तेव्हा ती मूर्तीपूजा ठरत नाही का? हा प्रश्न वादासाठी नसून कोणास याविषयी काही सुयोग्य स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास कृपया दयावे. मला इतकेच म्हणावयाचे आहे की जो देव अमूर्त  आहे,त्याला मशीद इत्यादींची काय गरज? माझ्या मनात आणखी एक प्रश्न असा आहे,की जेव्हा लोक नमाज अदा करतात,तेव्हा त्यांना डोळे बंद केल्यावर अल्लाची प्रतीमा दिसते का? की ती एक अध्यात्मिक  शून्य  अवस्था असते?कारण  डोळे मिटले तरी डोळ्यांसमोर प्रतीमा येतातच.असो,हा मुद्दा अनुभूतीचा विषय असून सर्वांना सारखा लागू होणे शक्य नाही.
काही लोक असा दावा करतात की मो.पैगंबर हे शेवटचे प्रेषित होते.त्यांच्या पूर्वी हजारो प्रेषित होऊन गेले.मात्र आता पुन्हा दुसरा  प्रेषित निर्माण होणार नसल्यामुळे देवाने त्यांनी प्रकट केलेल्या ग्रंथाला  'अपरिवर्तनीय' ठेवले आहे;आणि त्यात आजपर्यंत किरकोळसुध्दा फरक झालेला नाही. आजचा ग्रंथ खरेच अपरिवर्तनीय राहिला आहे का? माझ्या मते कोणत्याच धर्माचे कोणतेच ग्रंथ अपरिवर्तनीय आहेत असे म्हणणे अत्यंत धाडसाचे होईल. या बद्दल वस्तुस्थिती अशी की पैगंबरांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी तत्कालीन खलीफा व पैगंबरांचे जावई यांनी अनेकांजवळ असलेले कुराणाचे पाठभेद आणि प्रती एकत्र करून त्यातील प्रक्षिप्त भाग काढून टाकला.यात त्यांनी 'आयेशा' या पैगंबरांच्या पत्नीजवळील भागही नाकारला.यानंतर २५०-३०० वर्षांनी इब्ने मुक्ल,इब्ने मुसा,मुजाहीद या मुस्लीम संतांनी ते(कुराण) बगदादच्या गादीखाली पुन्हा प्रमाणित केले.
              आता काही लोक आक्षेपार्ह आयतींसंदर्भात असा दावा करतात,की त्या तत्कालीन परिस्थितीनुरूप योग्य होत्या.आणि जो मुळातून पैगंबरांचे चरित्र वाचेल,आणि कुराणाचा सखोल अभ्यास करेल त्यालाच या आयतींचा खरा अर्थ समजेल वगैरे;पण प्रथमदर्शनी वरील न्या.लाहोट यांच्या निकालावरून आपण आपल्या परिने निष्कर्ष काढू शकतो.

ज्यू धर्म:
हा  हिब्रू किंवा ज्यू लोकांचा धर्म आहे.यातही एकेश्वरवाद आहे.आणि 'जेहोवाह' हा एकमेव ईश्वर हे लोक मानतात.याहोवाहा हा ईश्वर त्याच्या लोकांच्या बाबतीत प्रेमळ आणि दयाळू असून इतर (देवाला मानणाऱ्या) लोकांचा तो बदला घेतो.
     ज्यू धर्म ई.स.पू. १३ व्या शतकात  'मोझेस' या प्रेषिताने पलेस्तैन इथे स्थापन केला.त्यावेळी हिब्रू समूहांच्या अनेक देवता होत्या.तत्कालीन राजा फारावो हा हिब्रू लोकांचा अत्यंत द्वेष करीत असे. त्याने कैक हिब्रू बालकांचे शिरकाण केले होते.त्यातून मोझेस बचावला.याने पुढे जाऊन हिब्रू लोकांना संघटीत केले. मोझेसला ईश्वराकडून १० आज्ञा प्राप्त झाल्या.आणि एकेश्वरवादाचा साक्षात्कार झाला. ज्यूंचा धर्मग्रंथ जुना करार मूळ  हिब्रू भाषेत असून तो नंतर ग्रीक आणि अगदी अलीकडे इंग्रजीत भाषांतरीत झाला. तो तनख स्वरूपात आहे. यात ज्यू लोकांची जीवनपद्धती,नीतिनियम,काव्य,दंतकथा,वैद्यक तसेच ज्योतिष आदी गोष्टीं समाविष्ट आहेत.याशिवाय जुन्या करारात विश्वाची उत्पत्ती,आदमने केलेली ईश्वरी अवज्ञा,त्यामुळे त्याला झालेली शिक्षा,मोझेसचे महात्म्य,भरकटलेल्या ज्यू लोकांना मार्गावर आणण्यासाठी ईश्वराने योजलेल्या घटना,त्याचा उद्देश वगैरेंचा उल्लेख आहे.इस्त्रायल या शब्दाचा उल्लेख प्रथम हिब्रू बायबलमध्ये आढळतो. 'जेकब'चे एका विचित्र अतिमानवी शक्तीशी मल्लयुद्ध झाल्यानंतर त्याला इस्रायल हे नाव मिळाले.आणि त्याच्या कृपाछायेत जे लोक वाढले,त्यांना इस्रायली असे म्हटले गेले. इस्रायल शब्दाचा अर्थ देवाभीमुख असा आहे. सोलोमन,अब्राहम,डेव्हिड,(अपभ्रंश: सुलेमान,इब्राहीम,दाउद) या तीन महान पुरुषांचा ज्यू,ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात उल्लेख आहेत आणि त्यांना आदरणीय मानलेले आहे.ज्यू धर्म हा ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या खूप पूर्वीचा असून हे तिन्ही धर्म अब्राम्हिक म्हटले जातात.

जुना करार(ज्यूंचे बायबल): तोराह- म्हणजे आज्ञा,सूचना,कायदे इत्यादी. हा पाच पुस्तकांचा समूह मानला जातो.जेनेसिस,एक्झोडस,लेव्हीतीकस,नंबर्स,आणि ड्युटेरोनोमी.राबिनिक परंपरेनुसार तोराह्ची ही पाच पुस्तके (शेवटच्या ८  व्हर्सेसचा अपवाद सोडल्यास) मोझेसने लिहिली.मात्र अनेक विचारवंतांच्या मते याचे अनेक लेखक होते,आणि या सर्व गोष्टींना अनेक शतकांचा काळ लागला असावा. यातील पहिली चार पुस्तके ही चार वेगवेगळ्या विचारधारांकडून जमा करून एकत्र करण्यात आली. हे चार माध्यमे होती: जाहविस्त,इलोहिस्त,ड्युटेरोनोमीस्ट आणि प्रेषित. प्रथम चार पुस्तकांचा काळ हा  ईसपू.८-६ वे शतक मानला जातो. ड्युटेरोनोमी,ज्यात मृत्यू म्हणजे काय,वगैरे दिलेले आहे,हे पुस्तक सहाव्या शतकात लिहिले गेले.
    मोझेसनंतर इसैयाहा,जेरेमियाह,एझीकील,तसेच आणखी १२ लहान प्रेषितांचे(मायनर प्रोफेटस्) उल्लेख आहेत. या मायनर प्रोफेटसनीच नंतर मूळ ग्रंथावर इसपू.५३८-३३२ दरम्यान संस्करण केले.
ग्रेट  सिन्यागोग : ही ज्यूंनी भरवलेली एक प्रकारची धर्मपरिषद होती. यात १२० विचारवंत,संत,प्रेषित वगैरे लोक होते.काहींच्या मते ही संख्या ८५ इतकी होती.प्रेषित लोकांनी 'तोराह' ग्रेट असेंब्लीकडे सोपवल्या.त्या तोराह हगाई,झेचारीयाल्ड आणि मालाची यांनी धर्मगुरूंकडून स्वीकारल्या.मोझेसपासून ते इझीकील,ड्यानियल,इस्थर आणि बिब्लीयल कॅनोनमधील १२ लहान प्रेषित यांच्या धार्मिक साहित्यावर साधकबाधक चर्चा होऊन या लोकांनी "मिस्नाह"  या प्रार्थना निर्माण केल्या .त्याचे ३ भागात विभाजन केले: मिडारश्,हलाकोट आणि अग्गाडोट. सिन्यागोगच्या लोकांनी हा कॅनॉन केवळ पूर्ण केला नाही,तर त्यास वैज्ञानिक परंपरेची जोड देण्याचा प्रयत्न केला.
    इस्रायल ही भूमी ३००० वर्षांपासून ज्यू लोकांसाठी धार्मिक आणि पवित्र मानली जाते.इसपू.११ व्या शतकापासून ज्यू समूहांनी इस्रायलवर राज्य केले. नंतर असिरीयन ,बाबिलोनियन,पर्शियन ,ग्रीक,सास्सरीयन,आणि रोमन राज्यांच्या आक्रमणामुळे व त्यामुळे झालेल्या ज्यूंच्या इतर प्रदेशातील विस्थापनामुळे ज्यूंचा प्रभाव कमी कमी होत गेला. इसपू. १३८ साली रोमन साम्राज्याविरुध्द ज्यूंनी बंड केले पण त्यात त्यांना यश आले नाही.इस.६३८ मध्ये मुस्लिमांनी हा प्रदेश जिंकून त्यावर अगदी अलीकडे १५१७ सालापर्यंत राज्य केले.१५१७ साली हा प्रदेश ओट्टोमन राजाच्या अधिपत्याखाली आला.
इस्रायल येथे ज्यूंची अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत.यात ज्यूंचा राजा सोलोमनच्या पहिल्या व दुसऱ्या मंदिराचे अवशेष आहेत. या मंदिरांशी संबंधीत जो ज्यू समाज होता,त्याच्या अनेक मह्त्वाच्या परंपरा आहेत.यांचा संबंध आधुनिक ज्युडीसमशी जोडला जातो. मिस्नाह आणि जेरुसलेम तालमूद हे ज्युडीसमचे महत्वाचे धर्मग्रंथ इथे लिहिण्यात आले.ज्यूंच्या दुसऱ्या मंदिराच्या विध्वंसानंतर 'तिसऱ्या' मंदिराची इच्छा इझीकीलच्या पुस्तकात दिलेली आहे.हे मंदिर पुढे येणाऱ्या 'मसीहा'च्या काळात पूर्ण होईल असे म्हटले आहे.इतकेच नाही तर इझीकीलने त्याचे आर्किटेक्चरल प्लान्स सुध्दा पुस्तकात रेखाटले आहेत.
        ज्यू धर्मात जी प्रार्थना केली जाते,तिला अमिदा असे म्हणतात.अमिदा सारांशाने साधारणतः अशी असते
-' हे ईश्वरा, आमच्या पूर्वजांच्या अब्राहम,जेकब,इसाक च्या ईश्वर,हे सृजनकर्त्या ,सर्वकालीन परमेश्वरा, तू वायू आणि पाऊस बनवलास.तू प्रेमळ आणि करुणामय आहेस! तू मृतांना जिवंत  करतोस,आजाऱ्यांना बरे करतोस,तुझ्यासारखे दुसरे कोणी नाही. आम्हाला ज्ञान दे! आम्हाला अंतर देऊ नकोस.आमच्या पापांसाठी आम्हाला क्षमा कर.तुझे सर्व शत्रू लवकरच कापले जावोत.तू तुझ्या जेरुसलेममध्ये परत ये,आणि त्याला पूर्ववत कर!! आमचे मंदिर पूर्ववत बनू दे.' 
    प्रार्थना मध्येच तोडू नये किंवा प्रार्थनेत अडथळा येऊ नये असा नियम आहे.


ज्यूंची धर्मतत्वे : ज्यूंच्या धर्मतत्वांमध्ये श्रद्धा आहेच पण श्रद्धेपेक्षा कृतीला अधिक महत्व दिलेले आहे.विचारवंत,संत प्रेषित इत्यादी लोक होते.
१)देव आहे.
२)देव एकच आहे.
३) तो इटर्नल आहे.
४) फक्त देवाची (जेहोवाह) प्रार्थना करावी.
५)प्रेषितांचे शब्द खरे आहेत.
६)मोझेस हा महान प्रेषित होता.

७)इथे आणखी दुसरी कोणती तोराह( आज्ञा,सूचना ) अस्तित्वात नाही.
८)देवाला मानवाची कर्मे आणि विचार माहित आहेत.
९)देव चांगल्या लोकांना त्याचे फळ देईल आणि वाईट लोकांना त्यांच्या पापाची सजा मिळेल.
१०)"मसीहा" येणार आहे !! इत्यादी.


ज्यू धर्मातील आक्षेपार्ह विधाने आणि विसंगती: 
१)जुडाईसम मध्ये ईश्वर आणि इस्रायली लोक यांच्या नात्यालाच केवळ केंद्रस्थानी मांडले आहे. म्हणजे देव फक्त इस्रायली लोकांवर प्रेम करतो का?ईश्वर हा त्याच्या लोकांच्या बाबतीत प्रेमळ आहे,पण मार्ग सोडून गेल्यास तो 'बदला ' घेतो.
२) आदमपासून मानवतेची निर्मिती करून देवाने स्वतःची महानता दाखवून दिलेली आहे. जुन्या करारानुसार आदम हा पृथ्वीवरील प्रथम मनुष्य ६००० वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. ज्यास वैज्ञानिकदृष्ट्या /मानववंशशास्त्रानुसार कोणताही आधार नाही.कारण मानवी जीवन लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे.
३)मसीहा ची संकल्पना: एके दिवशी मसीहा येईल आणि तो आपल्या ज्यू/इस्रायली लोकांचे उत्थान करेल.तेव्हा मानवतेने उंची गाठलेली असेल.भौतिक जगत नष्ट होईल. आणि तो आपल्या लोकांना देवत्वाला वा मोक्षाला घेऊन जाईल. या पूर्वी दुसरा कोणताही मसीहा येणार नाही.(तसा तो येणे शक्य नाही).कारण हे सर्वात शेवटी घडेल. या संकल्पनेचा अतिशय पगडा असल्यामुळेच मुळात ज्यू असलेल्या येशूने जेव्हा ज्युंच्याच धार्मिक परंपरांना धक्का देण्याचा प्रयत्न केला,तेव्हा त्यांनी येशूला अत्यंत क्रूरपणे क्रुसावर टोकदार खिळ्यांनी ठोकून ठार मारले. ज्यूंचे हे कृत्य जगातील काही अत्यंत क्रूर घटनांपैकी एक मानली जाते. या घटनेमुळे ज्यू धर्मावर आजपर्यंत आणि पुढेही मानवाचा इतिहास जोपर्यंत राहील,तोपर्यंत न मिटू शकणारा कलंक लागला.
४)प्रेषित असणे हा चमत्कार आहे.मोझेस हाच एकमेव प्रेषित होता.त्याचे शब्द हे प्रत्यक्ष ईश्वराचे शब्द होते.
५)जेहोवाहा हाच एकमेव देव आहे.
६)इस्रायलच्या राज्यासाठी राजाची आवश्यकता नाही.हे काम कोर्ट सुध्दा करू शकते.खरे म्हणजे कोर्टाचीही गरज नाही.देव आणि तोराह आपल्या लोकांना बरोबर एकत्र समाजात बांधून ठेवतील .
७)तोराह अपरिवर्तनीय आहेत.
८) आमच्या पापांसाठी आम्हाला क्षमा कर.तुझे सर्व शत्रू लवकरच कापले जावोत.तू तुझ्या जेरुसलेममध्ये परत ये,आणि त्याला पूर्ववत कर!! आमचे मंदिर पूर्ववत बनू दे.


ख्रिश्चन धर्म:

ज्यूंचा जुन्या करारात मसीहाबद्दल जी भविष्यवाणी केलेली आहे,तो मसीहा म्हणजे 'येशू ख्रिस्त' अशी सर्व ख्रिश्चन धर्मियांची गाढ श्रद्धा आहे.ख्रिश्चन हा शब्द मूळ ग्रीक शब्द 'ख्रिस्तोस' वरून आलेला आहे.त्याचा अर्थ आहे- अभिषिक्त/अभिषेक झालेला.हा धर्म येशूच्या धर्मोपदेशांवर,प्रवचनांवर,शिकवणुकींवर आधारलेला आहे.
    येशू स्वतः जन्माने ज्यू होता.इसपू.४ साली त्याचा जन्म झाला.त्याची आई मेरी ही कुमारी होती आणि तिच्या पोटी कौमार्याला बाधा न येत येशूचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे.याचाही जन्म मोझेसप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत झाला.यावेळी ज्यूंवर रोमन साम्राज्याचे आधिपत्य होते.वयाच्या १२व्या वर्षी येशूने ज्ञान संपादन करण्यासाठी अरण्याचा मार्ग निवडला तेथे धार्मिक चिंतन मनन करत त्याला ईश्वरी साक्षात्कार झाला.एक मतप्रवाह असाही आहे,की वयाच्या १२ व्या वर्षापासून येशूने विविध प्रदेशात भटकंती केली.या काळात तो भारतातही येऊन राहिला.त्यानंतर वयाच्या ३० व्या वर्षी तो रोमला परत आला.याचवेळी त्याने जॉन या बाप्टीस्टकडून बाप्तिस्मा घेतला.योहन्ना जॉन याने 'आता धरतीवर लवकरच ईश्वराचे राज्य येईल" असे सांगत त्याला दीक्षा दिली.आणि येशूने लोकांना धर्मविषयक उपदेशपर प्रवचने द्यायला सुरुवात केली.त्याच्या उपदेशातल्या ५ आज्ञा याप्रमाणे होत्या-
१)हिंसा करू नका.
२)व्यभिचार करू नका.
३)जुन्या ग्रंथात (जुन्या करारात) म्हटले आहे की कुणी तुमचा डोळा फोडला तर तुम्ही त्याचा डोळा फोडा! पण मी(येशू) तुम्हाला सांगतो,की तुम्हाला कुणी एका गालावर मारले तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा!!
४)शपथ घेऊ नका. फक्त हो/नाही म्हणा.
५)प्राचीन ग्रंथामध्ये(जुन्या करारात) म्हटले आहे की फक्त आपल्या(धर्मियांच्या)लोकांवर प्रेम करा! पण मी (येशू ) तुम्हाला सांगत आहे की आपल्या शत्रूवरही प्रेम करा!!
     येशूचे हे विचार निश्चितपणे आदर्श होते.त्यामुळे लोक त्याच्या प्रवचनांना जमू लागले. मात्र हे विचार आदर्श असले तरी तत्कालीन परंपरावादी ज्यू समाजाला आणि त्यांच्या परंपरांना धक्का देणारे ठरले.लोक येशूकडे आपली दु:खे घेऊन येत आणि तो त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधी बऱ्या करीत असे.लोक त्याला मसीहा मानू लागले.येशू म्हणायचा "धनिकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही.आपली सारी संपत्ती गरीबांमध्ये वाटून टाका आणि माझ्यासोबत या!" 
  काही धर्मसिद्धांत: 
१)  येशुनेही एकेश्वरवाद मानला आहे.
२)मात्र याचवेळी त्याने त्रित्व सिद्धांतही सांगितला.पिता(ईश्वर),पुत्र (प्रेषित) आणि पवित्र आत्मा हे तिन्ही सारखेच अनादी,अनंत आणि सर्वशक्तिमान आहेत असे म्हटले आहे.
३)हे संपूर्ण विश्व ही ईश्वराचीच निर्मिती असून ईश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवणे हे मानवी जीवनाचे ध्येय आहे.आणि मानवाला भौतिक शरीरापेक्षा  मानवी आत्म्याला मह्त्व दिलेले आहे.
४)कर्मसिद्धांत: पाप-पुण्यानुसार मानवाला स्वर्ग वा नरकाची प्राप्ती होते.
५)केलेल्या पापाची कबुली,ईश्वरावरील श्रद्धा,आणि प्रायश्चित्त यामुळे मनुष्य पापमुक्त होतो.
६)
           चर्च :
 सर्व ख्रिश्चन लोक मानतात की येशूने चर्चची स्थापना केली.त्याने सेंट पीटर याला प्रमुख धर्मगुरू बनवले.आणि त्याला सांगितले की हे चर्च शतकांपर्यंत राहील.सेंट पीटरचा मृत्यू रोम येथे झाला,त्यामुळे रोम येथिल बिशप यांना चर्चच्या अध्यक्षांचा आणि पृथ्वीवरील' येशूचे प्रतिनिधी' असा दर्जा मिळाला.
   ज्यू धर्मातील अनेक वाईट रूढींवर आघात केल्यामुळे त्याचेबद्द्ल ज्यू समाजात असंतोष पसरला.कट्टरपंथी धर्मगुरूंनी त्याला प्रचंड विरोध केला.विशेषतः त्याला लोकांनी 'मसीहा" मानणे त्यांना खटकले.त्यांच्या मते त्याच्यात मसीहा म्हणावे असे काहींही नव्हते.त्यांना फक्त आपल्या परंपरा आणि कर्मकांडावर विश्वास होता.आणि त्यासाठी ते आपल्या परंपरांना जपण्यासाठी हत्या करायलाही तयार होते.आणि मसीहा हा (जगाच्या)शेवटी येणार होता.स्वतः येशुनेही आपण ईश्वराचा पुत्र असल्याचे म्हटले होते.स्वतःला ईश्वरपुत्र म्हणवून घेणे तेव्हा घोर पाप मानले जात होते.
   येशूचा मृत्यू:
खरे म्हणजे येशू ज्यू धर्माला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला असता,पण ते होणे नव्हते.त्याला विरोध करणाऱ्यांनी तो सुध्दा एक ज्यू धर्मीय आहे,हे समजून घेतले नाही.त्यांनी धर्माला त्यांच्या देवाचे हत्यार म्हणून वापरले.यामुळे येशू त्यांना म्हणाला की 'तुमचा बाप देव नसून राक्षस आहे!' यामुळे तत्कालीन ज्यू समाज त्याचा द्वेष करू लागला.ज्यांना त्याचे विचार पटले,ते त्याच्यासोबत गेले.ज्यू समाज आणि धर्मगुरू स्वतःच्या धर्मातील तत्वांनी इतके अंध झाले होते की त्यांना खऱ्या ईश्वराचा विसर पडला.येशुविरुद्ध क्रूर षड्यंत्र रचण्यात आले.तो इस.२९ मध्ये रोम येथे गेला असता त्याला पकडण्यात आले.त्यावेळी 'पिलातूस' हा रोमचा गव्हर्नर होता. पिलातूस प्रथम म्हणाला 'हा निर्दोष आहे' पण ज्यूंनी ऐकले नाही. रोमनांना या अंतर्गत धार्मिक वादाशी काहीच देणेघेणे नव्हते.मात्र त्यांना ज्यूंवर राज्य करायचे होते.त्यामुळे ज्यूंना दुखावले असते तर कदाचित ज्यूंनी रोमन साम्राज्याविरुद्ध बंड पुकारले असते.म्हणून त्यांनी येशूला बळी देण्याचे ठरवले.त्याचेवर स्वतःला मसीहा /देवपुत्र म्हणवून रोमन साम्राज्याविरुद्ध बंडसदृष्य हालचाली केल्याचा आरोप करण्यात आला.आणि त्याला कृसाची शिक्षा देण्यात आली.त्याला क्रुसावर खिळ्यांनी भोसकून ठार मारण्यात आले.मरतानाही येशूने आपल्या मारेकर्‍यांसाठी प्रार्थना केली की ईश्वराने त्यांना माफ करावे;कारण ते काय करीत आहेत हे त्यांचे त्यांनाच समजत नाही!
      मृत्युनंतर येशू ३ दिवसांनी पुन्हा उठून बसला(जिवंत झाला),असे मानले जाते.आणि यानंतर ४० दिवसांनी तो स्वर्गात गेला असे म्हटले जाते.


       येशूच्या मृत्युनंतर त्याच्या १२ शिष्यांनी त्याच्या शिकवणूकींवर आधारित नवीन धर्माचा प्रचार व प्रसार केला.यालाच ख्रिश्चन धर्म म्हटले गेले.सेंट पौलूस,अन्तीओक,प्रोफुस यांनी मासिडोनिया,एशिया मायनर आणि युनानमध्ये धर्माचा प्रसार केला.यानंतर रोम हे ख्रिश्चन धर्माचे मुख्य केंद्र बनले.ख्रिश्चन धर्माचा ग्रंथ अर्थात बायबलचा 'नवा करार ' हा इस. पहिल्या शतकाच्या शेवटी लिहिला गेला.नव्या कराराची आजमितीस विविध लेखकांनी लिहिलेली किमान सत्तावीस पुस्तके उपलब्ध आहेत.
सर्व  ख्रिश्चन मानतात की येशुनेच चर्चची स्थापना केली.पण ख्रिश्चन समुदायात नंतर फुट पडून अनेक पंथ निर्माण झाले.त्यामुळे त्यांची अनेक चर्चेस अस्तित्वात आली.
१)रोमन कॅथोलिक चर्च
२)ऑर्थोडॉक्स : जे अनेक शतकांपूर्वी रोमपासून वेगळे झाले त्या ख्रिश्चन लोक.
३)प्रोटेस्टंट
४)ऐन्ग्लीकन समुदाय: या समुदायावर प्रोटेस्टंटस् चा प्रभाव असला तरी हे स्वतःला प्रोटेस्टंटस् पेक्षा वेगळे मानतात.


प्रोटेस्टंटस् हे चर्चचे अदृश्य स्वरूप मानतात तर कॅथोलिक चर्च हे संघटन आणि दृष्य स्वरुपात असून कॅथोलिक चर्चला ते कॅथोलिक,एक,पवित्र आणि एपोजेल्स च्या काळापासून सुरु आलेले चर्च म्हणून अपेक्षेपेक्षा जास्त महत्व दिले जाते.

ख्रिश्चन  धर्मातील विसंगती :


१)एकेश्वरवाद आणि त्रिक सिद्धांत
२)व्हर्जिन मेरी संदर्भातील वाद: बायबलमध्ये अनेक मेरींचे उल्लेख आढळतात.येशूची आई मेरीला तिच्या आईवडिलांनी( जोव्हाकिम आणि अना ) तिच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी एका देवळात अर्पण केले होते तिला साक्षात्कार झाला होता की तिच्या पोटी येशू जन्मणार आहे.अपोस्तोलिक काळानंतरच्या या काळाची मुळे काहींच्या मते पागन संस्कृतीशी जोडली गेली असल्याचे म्हटले आहे. त्या काळी शारीरिक संबंध मग ते वैवाहीकांमधील असले तरी त्यात पाप /संशयास्पदरीत्या बघितले जात होते..मेरीसाठी थिओतोकस अर्थात देवाची आई असा शब्दप्रयोग वापरण्यात आला होता.हा शब्द पहिल्यांदा इजिप्तच्या अलेक्झांड्रिया येथे ४ थ्या शतकात वापरण्यात आला. तर काहींच्या मते(मुख्यत्वेवरून नेस्तोरीअस-असिरीअन चर्च ऑफ द ईस्ट) येशू हा पूर्णपणे 'मानवी' होता.काही प्रोटेस्टंटस्च्या मते मेरीला येशूच्या नंतरही ती जोसेफसोबत असताना  मुले झाली होती.कारण बायबलमध्ये येशूच्या भाऊ आणि बहिणींचा उल्लेख आढळतो.मात्र कॅथोलीक्स त्यांना जोसेफची पूर्वीची मुले मानतात.मात्र बायबलमध्ये मेरी आणि जोसेफ एकत्र आल्याचा उल्लेख आढळतो (came together).
   म्याथ्यू म्हणतो जोसेफचे  हा मेरीशी येशूच्या जन्मापर्यंत शारीरिक संबंध नव्हते.तीने येशूला नैसर्गीकरीत्या जन्म दिला.ल्यूक २:७ -इथे येशूला मेरीचा प्रथम पुत्र म्हटले आहे.म्याथ्यू १२:१६: /फ.फ.१३:५५;५६- यात येशूच्या भावंडांचा उल्लेख आहे.ख्रिश्चन धर्मात लग्न ही गोष्ट आदर्श आणि जिची देवाने रचना केली अशी मानली जाते.ती स्त्री आणि पुरुषांनी (शारीरिक दृष्ट्या)एकत्र(as one flesh--wayne jackson in 'christian courier) येण्यासाठी असते.
मग ही गोष्ट जोसेफ -मेरी यांच्याबाबतीत का नाकारली जाते? ...(.....अपूर्ण )
[ टीप:हा लेख सध्या अपूर्ण आहे.तो संपूर्ण स्पष्टीकरणांसह संपादित होऊन  व्यक्त झाल्याशिवय पूर्ण  झाल्याशिवाय आणि नीट समजून उमजून घेतल्याशिवाय  कुणीही प्रतिक्रिया देऊ नये. कारण मला जे काय म्हणावयाचे आहे,त्याचा सारांश केवळ एवढ्याने व्यक्त होत नाही.धन्यवाद.](क्रमशः)
copyright (c) all rights reserved.

Saturday, May 21, 2011

न्याययंत्रणा सामान्य व्यक्तीप्रमाणे स्खलनशील आहे का?

आजचे पुढारी आणि सामान्य मनुष्यही आपापल्या तत्वांपासून कधीच ढळले आहेत. माणुसकी ,नीतिमूल्ये आता माणसात अभावानेच आढळतात.प्रत्येकाला फक्त स्वतःची विवंचना आहे;केवळ माझे भले होवो,इतरांचे काहीही होवो ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे! जो तो अडचणीत सापडलेल्याला कापायला बसला आहे.मनुष्य म्हणविणारा माणूस इतका स्वार्थी आणि आत्मकेंद्री का बनला असेल? की मनुष्य मुळातच स्वार्थी आहे? असे असेल तर मग याला काही लोक अपवाद का आहेत? आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी या भारत देशासाठी स्वतःचे रक्त का सांडले असेल? त्यांना कुटुंब,घरदार नव्हते का? त्यांनी देशापुढे आपल्या आशाआकांक्षा,स्वनांचा बळी का दिला असेल?
       मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात मानवाला फक्त पोटाच्या भुकेची चिंता होती.निवारा ही त्यानंतरची गोष्ट;अन् वस्त्रे खूप नंतरची गरज होती.जसजसा मानव उत्क्रांत होत गेला,प्रगल्भ होत गेला,त्याचा मेंदू विकसित होत गेला तसतशी त्याने इतर प्राण्यांवर सत्ता गाजवायला सुरुवात केली.शारीरिक दृष्ट्या दुर्बल मानवाने आपल्या बुद्धी आणि शस्त्रांच्या सहाय्याने त्याने व्याघ्र,सिंहादी प्राण्यांनाही काबूत केले.मानव हळूहळू समुहाने राहू लागला. इथे त्याचा समुहातील इतर मानवांशी संघर्ष सुरु झाला;तो शिकारीव्रून असेल,समुहातील स्त्रियांच्या संदर्भात असेल किंवा आणखी इतर कारणांनी असेल- पण इथे समुहातील काही ज्येष्ठ,तज्ञ व्यक्तींना समाजापुरते काही नीतिनियम बनविण्याची आवश्यकता भासू लागली.त्याप्रमाणे त्यांनी ते नियम बनवले सुध्दा;पण स्वतःच्या पारड्यात माप जास्त टाकून घेतले.स्वतःला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना इतरांच्या मानाने सौम्य दंडक बनवले.हे जे लाखो वर्षांपूर्वी घडलं,तेच आपल्या वेदिक संस्कृतीच्या सुरुवातीलाही मनुने घडवलं.चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली.सर्वांना समान न्याय नव्हता! ज्यामुळे शूद्र आणि इतर दोन वर्णांना कमीअधिक प्रमाणात खालचा दर्जा देण्यात आला,ज्याची फळे भारताने स्वातंत्र्यपूर्वकाळापर्यंत भोगली.नंतर घटनेने ही व्यवस्था मोडीत काढून सर्वांना समान न्यायाचा पुरस्कार केला.पण घटना योग्य पद्धतीने राबवली गेली आहे का? आज सर्वांना या स्वतंत्र भारतात खरोखरच समान न्याय मिळतो आहे का?आजही धर्म,जाती,पंथ वर्णभेद पाळला जात नाही का? एखाद्या व्यक्तीच्या  राजकीय वा आर्थिक प्राबल्याचा न्याययंत्रणेवर प्रभाव पडतो आहे का? न्याययंत्रणेला भ्रष्टाचाराची लागण झालेली आहे का? भारतीय न्यायव्यवस्था कासवाच्या गतीने का जात आहे? भारतीय न्यायव्यवस्थेने इंग्रजांपासून फक्त औपचारिकता उचलली आहे का? त्यांची गती का नाही घेतली?आधुनिक साधने उपलब्ध असताना त्यांचा वापर का केला जात नाही? बाबू लोकांना पैसे दिल्याशिवाय कोर्टाचेही काम पुढे का सरकत नाही? भारताची २५%जनता(वादी,प्रतिवादी,त्यांचे नातेवाईक,वकील इत्यादी याप्रमाणे प्रत्येक खटल्यात किमान दहा व्यक्ती)कोर्टाच्या चकरा मारत असताना न्यायालये 'परदु:ख शीतलम्' अशी भूमिका घेऊन शांत कशी राहू शकतात? बऱ्याच कनिष्ठ न्यायालयांमध्ये न्यायाधीशांना एखाद्या खटल्यासंदर्भात वकील लोक जेव्हा उच्च वा सर्वोच्च न्यायालयांच्या निकालांचे संदर्भ देतात,तेव्हा न्यायाधीशांकडून त्यासंदर्भात 'रेडी मटेरीयल' म्हणजे त्या त्या निकालांच्या प्रतींची मागणी केली जाते,ती कोणत्या कारणासाठी? न्याययंत्रणा आळसावलेली आहे का? खालच्या न्यायालयांनी दिलेले निर्णय उच्च न्यायालय चुकीचे का ठरविते?आणि उच्च न्यायालयाचे निर्णय सर्वोच्च न्यायालय चुकीचे ठरविते,याचा अर्थ काय घ्यावा? यातून जनमानसात कनिष्ठ/उच्च/तत्सम न्यायालयांचे निर्णय चुकीचे असतात,असा चुकीचा(?)संदेश जात आहे,असे नाही वाटत?माफ करा, माझा कोणत्याही सन्माननीय न्यायालयांचा  अपमान वगैरे करण्याचा,वा त्यांच्या क्षेत्रातील ज्ञान-अज्ञान इत्यादींचा उल्लेख करण्याचा  हेतू नाही-मला सहजपणे जाणवलेले प्रश्नच फक्त मांडत आहे.काही वेळा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचेच निर्णय नंतर फिरवल्याचे दाखले आहेत.अर्थात पूर्वीच्या निर्णयाच्या वेळी वेगळे बेंच असते आणि आता वेगळे,हेही खरेच आहे.पण मग यातून हाही संदेश जात नाही का,की जरी सर्वोच्च न्यायालय ही एक प्रचंड मोठी यंत्रणा असली,तरी तिचे निर्णय व्यक्तिसापेक्ष असतात! संपूर्ण बेंचचे एकमत क्वचितच होते,असे का? कायद्यातील तत्वे जर एकसारखी लागू होत असतील,तर ही मतभिन्नता कशामुळे? मान्यय कनिष्ठ,उच्च ,सर्वोच्च वा तत्सम न्यायासनावर आरूढ सन्माननीय व्यक्ती या 'मनुष्यच' असतात;म्हणूनच ओघानेच हाही प्रश्न मनाला पडतो की 'न्यायालयीन यंत्रणा सामान्य व्यक्तीप्रमाणे स्खलनशील आहे का? कृपया जाणकारांनी माझ्या शंकांचे निरसन करावे.धन्यवाद.

वेड

वेड हे वादळाप्रमाणे असते.वादळाला दिशा काय देणार? ते घेतलेल्या व्यक्तीला त्यासोबत फरफटत जाण्याशिवाय पर्यायच नसतो.त्यातून जसे सृजन घडू शकते,तसेच बिघडूही शकते.विचारांना दिशा देण्याच्या 'विचाराला' वेडात थारा नसतो.तसे असले तर मग ते वेड नसते! तो आखीवरेखीव विचार फक्त ठरतो,आणि त्यात उत्स्फुर्तता कधीच येत नाही!

Monday, May 16, 2011

मन

आकाशाचं अन् मनाचं
नक्कीच काही नातं असतं,
आकाश दाटून येतं तेव्हा
मन सुध्दा भरून येतं...!

Tuesday, March 22, 2011

अस्वस्थ भारताचे प्रश्न आणि त्यावरील उपाय

      सध्या भारतात विविध प्रश्नांनी थैमान घातले आहे आणि सर्वसामान्य नागरिकाच्या मनात अनंत प्रकारे त्याबद्दल असंतोष पसरत आहे. या देशासाठी बलीदान करणाऱ्यांचा एक काळ होता,जेव्हा देशभक्ती शिवाय त्या लोकांना काही दुसरे सुचत नव्हते.कित्येकांनी ऐन तरुणाईत स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले.कित्येकांनी देशासाठी स्वता:चे संसार उद्ध्वस्त केले.कित्येकांनी अनेक वर्षे तुरुंगात काढली.कैक फासावर गेले.कित्येक कायमचे बेपत्ता झाले.त्या स्वातंत्र्यवीरांचा हा देश कायमचा ऋणी आहे. आणि आजची धूर्त  पुढारी मंडळी आयती मलाई खाण्यात मग्न आहे.स्वतंत्र भारताच्या उण्यापुऱ्या ६५ वर्षांत निर्माण झालेला हा प्रचंड मोठा विरोधाभास आहे!

      महागाई,भ्रष्टाचार,विषमता,जातीयता,धर्मांधता,लुच्चेगिरी,चापलूसी, नोकरशहांचा 'निष्काम' भ्रष्टयोग,मानवी मुल्यांची पायमल्ली ,भरकटलेली तरुण पिढी,बेरोजगारी,गुन्हेगारी,खून,बलात्कार,अंडरवर्ल्डची दहशत,शैक्षणिक संस्थांची मुजोरी आणि त्यामुळे गुणवत्तेची पायमल्ली,घाणीच्या साम्राज्यात आणि भ्रष्टाचाराने माखलेले सरकारी तर मालप्राक्टिस करून पेशंटला लुटणारे खाजगी दवाखाने,पैसे भरून नोकरीला चिकटलेले आणि  विद्यार्थ्यांच्या पिढ्याच्या -पिढ्या बर्बाद करणारे शिक्षक,चोराला सोडून संन्याशाला पकडून खंडणी मागणारे पोलीस,कासवाच्या गतीने चालणारी  आणि भ्रष्टाचाराची लागण झालेली न्यायव्यवस्था( जिथे वकील नावाचा वाकपटू तारखांवर तारखा मागून घेऊन न्यायप्रक्रियेस विलंब करतो आणि  शब्दांच्या जंजाळात अडकवून आणि शब्दच्छल करून न्यायाचे अन्यायात रूपांतर करतो,ती जागा!),एकीकडे कोट्यावधी रुपयांच्या गाड्यांतून फिरणारे उच्चवर्गीय तर दुसरीकडे ७५ रुपये रोजाने ५० डिग्री सेंटीग्रेड तपमानात डांबरी रस्त्यांचे काम करणारा रोहयो कामगार , रस्त्यावर मनुष्य मरत असताना पोलिसांचे आणि कोर्टाचे लचांड नको  म्हणून  पळ काढणारे पांढरपेशे,बिल न देता वस्तूची पूर्ण एम.आर.पी.घेऊन आणि चायनाचा माल माथी मारून ग्राहकाला आणि सरकारला फसवणारे व्यापारी,एकूणच नीतीमत्ता खालावलेला,क्वचित कधीतरी मोर्चा बिर्चा काढणारा,आणि आपले काम झाले की हळूच पळ काढणारा  अक्षरश: गांडू प्रवृतीचा- नेभळट माणूस ,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे किडलेली,सडलेली शासनयंत्रणा आणि ती चालवणारे सत्तापिपासू नेतेमंडळी !असे असंख्य प्रश्न!! हे आहे आजच्या महासत्ता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या भारताचं चित्र. पण नजीकच्या काळात हे चित्र बदलण्याची अंधुकशी आशा दिसते आहे.आज सारे उदासीन दिसत असले तरी आतून खदखद जाणवते आहे.एकंदरीत जे काही चालले आहे त्याविषयी संपूर्ण भारतीय जनतेच्या मनात हळूहळू असंतोष निर्माण होत आहे.ह्या असंतोषाचे आंदोलनात रूपांतर होईल,अशी हजारो आंदोलने होतील,आणि कदाचित लवकरच स्वकीय सत्तापिपासू ,स्वत:चीच तुंबडी भरणाऱ्या आणि देश विकायला बसलेल्या स्वार्थी पुढाऱ्यांची जमात नष्ट करण्यासाठी आणखी एक क्रांती घडेल.ही क्रांती-आवश्यक नाही की शस्त्रांनी होईल..ही क्रांती नि:शस्त्र आणि वैचारिक असेल.एका साध्या चांगल्या प्रामाणिक  विचारापुढे जगज्जेते राष्ट्रही नतमस्तक झाल्याचे दाखले आपल्याच इतिहासाने दिलेले आहेत.

    तर आता उपायांकडे वळूया- हे उपाय अंमलात आणले गेल्यास मला खात्री आहे की नजीकच्या काळात भारताचे चित्र निश्चितपणे बदललेले दिसेल. येत्या फक्त २५ वर्षांत भारत एक खराखुरा निधर्मी आणि महासत्ता बनलेला असेल. ते उपाय खालीलप्रमाणे-

१)मतदान सक्तीचे करावे.यामुळे गरीब वर्गाचे मत जे शंभर रुपयात विकले जाते,ते होणार नाही. आणि सर्वांनी मतदान केल्यामुळे आज ४०%मतदानातून (त्यात १० प्रतिस्पर्धी ) म्हणजे जेमतेम १०-२०% (त्यात बरीचशी विकत घेतलेल्या ) मतांवर नालायक उमेदवार निवडून येतात- ते होणार नाही.

२) भ्रष्टाचारावर युद्धपातळीवर काम हाती घ्यावे. यासाठी प्रामाणिक स्वयंसेवक ,प्रसार माध्यमे , सामाजिक संस्थांची मदत घ्यावी.भ्रष्टाचार दिसून आल्यास अशा व्यक्तीस मग ती सरकारी नोकर असो,वा पुढारी यांना कायमस्वरूपी त्या त्या पदावरून काढून टाकावे.त्यांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मालमत्ता जप्त करावी. हे काम अत्यंत कठोरपणे व्हावे.तिथे पंतप्रधान वा तत्सम पदाची व्यक्तीही अपवाद असू नये. १९७५ साली इंदिराजींनी आपले पद वाचवण्यासाठी देशांतर्गत आणीबाणी पुकारली होती.(ती त्यांच्या वैयक्तीक स्वार्थासाठी होती.)पण त्याचे जसे दुष्परिणाम झाले,तसे काही चांगले परिणामही दिसून आले होते. उदा.तेव्हा सरकारी खात्यांतील भ्रष्टाचारात कमालीची घट झाली होती.असे म्हणतात की लोक तेव्हा लाच घ्यायला घाबरत होते (गंमत आहे नाही?),आणि लोकांची कामे फुकटात होत होती. जो काय भ्रष्टाचार होत होता तो उच्च पातळीवर होता.पण सर्वसामान्य सरकारी कर्मचारी हा दहशतीमुळे नोकरीवर गदा येईल म्हणून 'इमानेइतबारे' नोकरी करत होता. हे सर्व सांगण्याचे कारण असे की नोकरशहा लोकांमध्ये भ्रष्टाचाराविषयी भीती उत्पन्न करण्यासाठी 'असा' काही उपाय करता येईल का?भ्रष्टाचाराच्या कारणांसाठी सरकार आणि खात्यांतर्गत 'इमर्जन्सी' लागू करून भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. आजचा सरकारी कर्मचारी मग तो चतुर्थ श्रेणी कामगार असला तरी त्याला किमान १२-१५०००/-रू. पगार मिळतो आणि तरीही लाच मागण्याचा भिकारचोटपणा काही कमी होत नाही. . पुन्हा त्यास विमा, पी, एफ.आरोग्यसेवा व  इतर सवलतीही असतात. आणि दुसरीकडे   ४०-५०  रुपये रोजावर   काम करणारे  शेतमजूर- त्यातही हे काम वर्षभर मिळत नाही. एकीकडे अतिसंपन्न नोकरशाही,गर्भश्रीमंत भांडवलशाही, घरात आणि देशात पैसा मावत नाही म्हणून स्वीस बँकेत पैसा ठेवून सर्वसामान्य जनतेस आश्वासनांच्या खैरातीवर भुलवणारी पुढाऱ्यांची जमात  आणि दुसरीकडे   एका वेळच्या पोटभर अन्नासाठी तडफडणारी जनता!  किती विरोधाभास आहे  !!

३) स्वीस बँकेतील वा इतर देशातील बँकांमधील पैसा (नामी-बेनामी,जो काय असेल) तो भारतात आणावा. तो तसा आणण्यात काही अडचणी असल्यास निदान ती खाती कायमस्वरूपी गोठवण्यासाठी स्वीस वा तत्सम बँकांवर दबाव आणावा.तो पैसा त्या त्या बँकांनी कधीही,कोणत्याही मार्गाने चलनात आणू नये. मात्र रिझर्वबँकेमार्फत सरकारने त्या गोठवलेल्या खात्यांतील रकमेएवढे नवीन चलन छापून त्याचा विनियोग दारिद्र्यरेषेखालील जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी करावा. सामान्य नागरिकांना करसवलती,विमा संरक्षण,आरोग्यसेवा पुरवाव्यात.

४)न्यायव्यवस्थेला गती द्यावी.आणि त्यातील भ्रष्ट न्यायाधीश,सरकारी वकील आणि न्यायदानाच्या कामात तारखांवर तारखा घेऊन विलंब करणारे खाजगी वकील यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.त्यांची सनद रद्द करण्यात यावी.अधिकाधिक न्यायालयांची स्थापना करावी आणि  खटल्यांचा ठराविक कालवधीत निपटारा न झाल्यास संबंधीत न्यायाधीश,सरकारी व खाजगी वकील,तसेच कारणाशिवाय गैरहजर राहणारे वादी-प्रतिवादी आणि साक्षीदार यांना शिक्षेची तरतूद असावी. आज भारतातील सर्व न्यायालये मिळून जवळपास ३ कोटी २५ लाख खटले प्रलंबित आहेत.वादी-प्रतिवादी-त्यांचे नातेवाईक-वकील-न्यायाधीश,साक्षीदार- याप्रमाणे एका खटल्याशी किमान १० लोकांचा संबंध येतो. भारतात ३.२५ कोटी गुणिले १० = ३२.५ कोटी लोक कोर्टात विविध खटल्यांत गुंतलेले  .म्हणजे भारताची किमा न २५% लोकसंख्या कोर्टाच्या चकरा मारत आहे! कधी लागतील हे निकाल?आरोपी म्हातारे होऊन मरूनही जातात.पण निकाल काही लागत नाही आणि शिक्षा काही होत नाही. ज्यांच्यावर अन्याय झाला ते बिचारे कोर्टाच्या चकरा मारून एक प्रकारची जन्मठेपच भोगतात जणू ! आरोपी-ते उजळमाथ्याने फिरतात आणि आणखी गुन्हे करत राहतात. आज सर्व न्यायालनंमध्ये फ्याक्स,इंटरनेट,मोबाईल  ई. सम्पर्क साधने उपलब्ध असताना पारंपारिक पद्धतीचाच अवलंब का केला जातो?आरोपीला समन्स बजावायचे तर  न्यायाधीशांनी आदेश देऊनही तेथिल बाबू लोक ते तयार करायला बरेच दिवस लावतात.मग ते बंद पाकिटातून त्या त्या पोलीस स्टेशनला पाठवले जाते.तिथे आणखी २-४ दिवस ते पाकीट टाईमपास करतं.केव्हातरी एखादा पोलीस आरोपीच्या पत्त्यावर जातो.आरोपी तिथे नसतोच.किंवा असला तरी 'सदर इसमाचे घरास कुलूप होते.त्यामुळे समन्स बजावता आले नाही.अश्या शेऱ्यानिशी पाकीट परत येते.एखादे वेळी समन्स बजावले गेलेच तर ते नेमके कोर्टाच्या तारखेच्या दिवशी बजावले जाते जेणेकरून 'बिचारे' आरोपी हजर राहू शकत नाहीत! न्याययंत्रणेने आपला औपचारिकपणा आता सोडून द्यायला पाहिजे.पूर्वी राजे-महाराजे स्वत:दरबार भरवून तत्काळ न्याय करीत असत.उदा.शिवाजी महाराज,अकबर वगैरे;समजा एखादा आरोपी हजर झाला नाही,आणि तुमच्याजवळ जर त्याचा मोबाईल नंबर आहे,इमेल आयडी आहे,तर खुद्द कोर्टाने वा संबंधीत कर्मचाऱ्याने त्याला फोन लावून 'कारे बाबा,तू का आला नाहीस? पुढच्या वेळेला असे केलेस तर एकतर्फी निकाल दिला जाईल' असा इशारा का देऊ नये? जर अकबर बादशाह ,शिवाजी महाराज आणि असे अनेक चांगले राजे जर औपचारिकता सोडून तडकाफडकी न्याय करू शकत होते,तर आजचे कोर्ट इतके 'फॉर्मल' कशासाठी? ही औपचारिकता सोडून दिल्यास येत्या २ वर्षांत ५०% खटले निकाली निघतील.

५)आजची शिक्षणपद्धती चुकीची आहे.त्यात बदल करावा.मुलांना धर्म ,जात,पंथ याविषयी शिकवू नये.इतिहास जो जसा आहे तसाच शिकवावा.उगाचच इतिहासाचे उदात्तीकरण वगैरे करू नये.राम,कृष्ण,येशू,पैगंबर,मनू,इत्यादी वादाचे विषय केवळ कथा म्हणून शिकवाव्यात.आपला इतिहास आदिमानवापासून सुरु होतो.त्यामुळे जे वैज्ञानिक तथ्य आहे तेच फक्त शिकवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर तंबाखू वा तत्सम वस्तूंचे सेवन करू नये.सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही स्वत:च्या मुलाला जसे शिकवता तसे शिकवावे. ग्रामीण भागात पालकांकडून लाच घेऊन विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवणारे शिक्षक सर्रास आढळून येतात. अश्या शिक्षकांना नोकरीतून कायमचे कमी करावे.१० वी ,१२ वी च्या परीक्षा या ५०% मौखिक स्वरूपाच्या असाव्यात आणि परीक्षक हे स्थानिक असू नयेत.पालकांनी सुरुवातीपासूनच आपल्या पाल्यावर सुसंस्कार करावेत.आणि कॉपी वगैरे प्रकारांचा त्याला स्पर्शही होणार नाही याची काळजी घ्यावी. शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नसून आयुष्याचा अर्थ समजावून घेण्यासाठी असते,हे पाल्याच्या मनावर ठसवावे.सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी.आणि त्याच्या विशिष्ट विषयातील प्राविण्य पाहून त्यास त्या विषयाचे विशेष प्रशिक्षण द्यावे.

६) व्यापाऱ्यांना १० रुपयांवरील कोणत्याही वस्तूचे बिल देणे बंधनकारक करावे.त्यासाठी सरकारने तश्या इलेक्रोनिक यंत्रणा प्रत्येक व्यापाऱ्याकडे,प्रत्येक  दुकानात, सोने चांदीच्या दुकानात बसवाव्यात.म्हणजे व्हाट वा तत्सम कर चुकवले जाणार नाहीत. ग्रे किंवा ब्ल्याक मार्केटींग होणार नाही.आणि ग्राहकांची लूट थांबेल.

७) वारंवार त्याच त्याच सरकारला निवडून देऊ नये! कारण वारंवार निवडून येणारे सत्ताधीश आपली पाळे-मुळे अधिक घट्ट करत जातात.त्यांना देशाची गुपिते माहित होतात.असे लोक सत्तापिपासू बनतात आणि मग ते त्यासाठी काहीही करू शकतात.असे लोक देशावर हुकुमशाहीसुद्धा लादू शकतात किंवा देशाच्या सुरक्षेला धोका पोचवू शकतात.संरक्षणयंत्रणा,न्याययंत्रणा, सरकार यांच्यात समन्वय असावा,पण देशाची संरक्षण गुपिते पंतप्रधानच काय राष्ट्रपतींनाही माहित असू नयेत.भारताची लष्करी गुपिते फक्त महत्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांनाच माहित असावीत. जनतेने क्षुद्र आश्वासनांना बळी न पडता मतदान करावे. देशाच्या भविष्याच्या दृष्टीने काय हिताचे ठरेल याचा विचार करून मतदान करावे.कोणताही एक पक्ष १० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेवर राहू नये,यासाठी घटनेत बदल करावा.१० वर्ष काळ उलटून गेल्यावर पुन्हा निवडणुका होऊन तोच पक्ष निवडून आला तरी त्याने दुसऱ्या पक्षाकडे सत्ता हस्तांतरीत करावी आणि विरोधी पक्षाची जागा सांभाळावी.आणि त्या नवीन सत्तेवर आलेल्या पक्षाने पूर्वीच्या पक्षासोबत त्यातील २०% लोकांना मंत्री मंडळात घेऊन सरकार स्थापन करावे. यात पाठींबा काढून  घेणे वगैरे भानगड असू नये यासाठी खाली मुद्दा क्र.१० मध्ये महत्वाचा उपाय सांगत आहे.

८) विषमता नष्ट व्हावी- भारतात प्रत्येकाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्यानुसार  काम मिळायला हवे.त्यासाठी सरकारी वा खाजगी कार्यालयांसाठी 'किमान वेतन' सरकारने ठरवून द्यावे,जे आजच्या चतुर्थ श्रेणी सरकारी कामगाराच्या वेतनापेक्षा कमी असू नये.शेतमजुराला वा रोहयो कामगाराला किमान १५०-२०० रू. रोज याप्रमाणे पगार मिळावा.आणि या कामाची वर्षातून किमान १५० दिवस रोजगाराची  हमी सरकारने घ्यावी. यासाठी आवश्यकता वाटल्यास सरकारने पडीक खाजगी शेते त्यांच्या मालकांकडून कराराने वा विकत घ्यावीत.आणि ती जमीन विकसित करावी.विषमता हा भ्रष्टाचारा इतकाच महत्वाचा मुद्दा आहे.इकडे तातडीने लक्ष देणे अवश्यक आहे!एकवेळ मध्यम आणि उच्चवर्गातील लोक जी क्रांती घडवून आणतील,ती नि:शस्त्र,वैचारिक असेल; मात्र  समाजाच्या दुर्बल घटकात धगधगणारा असंतोष भारताला रक्तरंजीत क्रांतीकडे ओढून नेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

९)भारतीय नागरिकांनी आपली कर्तव्ये समजून घ्यावीत.
बऱ्याच लोकांचा असा समज असतो,की त्यांना पोसणे,त्यांना हवे ते देणे,त्यांची सर्वतोपरी काळजी घेणे  ही देशाची जबाबदारी आहे! शेतकऱ्यांना प्याकेज हवे असते.यातील बहुतांश शेतकरी हे सधन असतात.नोकरदारांना(काम न करता) वेतन आयोगाचा फरक तत्काळ हवा असतो.व्यापाऱ्यांना विविध करसवलती हव्या असतात.बेकारांना काम हवे असते आणि  खाजगी कंपन्यांना आणि पुढाऱ्यांच्या शैक्षणिक संस्थांना  २०००/-रु.महिन्यावर १२ तास काम करणारे मजूर आणि शिक्षक हवे असतात.पालकांना आपल्या मुलांना महागड्या इंग्रजी शाळेत प्रवेश हवा असतो.गुंड मवाल्यांना पुढारी व्हायचे असते आणि पुढाऱ्यांना रोजच सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणजे सत्ता हवी असते.
     मित्रहो,आपण आणखी नव्या जातिव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेला जन्म देत आहोत,असे नाही वाटत? आजचा सामान्य शेतमजूर,कामगार,बेरोजगार यांना आपण "शुद्र"पण बहाल करून टाकलंय ! यांचा विचार आम्ही कधी करणार? 
            आम्ही संविधानात सांगितलेल्या आदर्श भारतीय नागरिकाच्या व्याख्येत  केव्हा समाविष्ट होणार? मित्रहो,अलीकडे काही मुर्ख आणि धूर्त पुढाऱ्यांमुळे हा देश अनिश्चिततेच्या गर्तेत ढकलले असले तरीही ,लक्षात घ्या-पुढारी किंवा सरकार म्हणजे हा  देश नाही! तुम्ही या मातीत जन्माला आलात,तेव्हाच तिचे ऋणी झालात. नुसते स्वतःपुरते  हक्क कसले सांगता? कर्तव्ये करा.आपण देण लागतो आपल्या देशाचं,देशबांधवांचं, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांचं! आपल्याला समान हक्क बहाल करणाऱ्या आपल्या संविधानाचं! जाती ,पाती,धर्म,पंथ,भाषा यावरून भांडत काय बसता? आपण एका मजबूत संविधानाने एकमेकांशी जोडले गेलो आहोत! मागचे सारे विसरून आपण संविधानाने घालून दिलेल्या मर्यादेत स्वतःचा धर्म पाळा,पण त्याला सार्वजनिक स्वरूप देण्याची काय आवश्यकता आहे? धर्म ही एक जीवनपद्धती आहे,हे आपण जाणतोच! मग भारतीय संविधान हाच आपण आपला धर्म का मानू नये? आपल्याला या अस्वस्थ भारताला स्वस्थ,समृध्द म्हणून पहावयाचे असेल तर नागरिक या नात्याने आपणच ते घडवू शकतो.पुढारी हे घडवीत नसतात.कारण बिघडविणे हिच त्यांची प्रवृत्ती आहे.आज देशात जी परिस्थिती आहे,तिला नागरिक म्हणून आपणच जबाबदार नाही का? आपणच निवडून देतोना,या नालायक पुढाऱ्यांना?स्वत:चे किरकोळ स्वार्थ पोसण्यासाठी! त्याचीच तर ही फळे आहेत. आपण  आपले कर्तव्य नीट न निभावल्यामुळे ही परिस्थिती ओढवलीय हे मान्य करा.आपली कामे पटकन होण्यासाठी आपणच लाच देवू करतो! भ्रष्टाचाराला: पुढारी,नोकरशाही आणि आपण भारतीय नागरिक-सारखेच कारणीभूत आहोत! आपण आपल्या स्वत:च्या कुटुंबापुरते मर्यादित झालो आहोत.स्वत:च्या क्षुद्र कोषातून बाहेर या ,आणि आता तरी जागे व्हा.ही परिस्थिती आपली आपणच फक्त बदलू शकतो.म्हणून देशहितासाठी सर्वांनी एकत्र या.आपण ही परिस्थिती नक्कीच बदलून टाकू.आपली ताकद या दिडदमडीच्या भ्रष्ट राजकारण्यांना दाखवून द्या!

१०) भारतात समांतर सरकार असावे!
भ्रष्टाचारी  शासन यंत्रणेवर आताच नियंत्रण ठेवले नाही तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.
यासाठी समांतर सरकार असण्याची निकड जाणवू  लागली आहे. अर्थात यासाठी घटनेच्या चौकटीत राहून घटनेत तसा बदल करावा लागेल. या शासनात निवृत्त न्यायाधीश, IAS, IPS अधिकारी,शास्त्रज्ञ, राष्ट्रीय दर्जाच्या समाजसेवी संस्था,लष्करातील काही निवडक अधिकारी,आणि कमांडोज असावेत.या समांतर सरकारने केंद्र आणि राज्य सरकारांच्या कामावर लक्ष ठेवावे.मात्र अनावश्यक हस्तक्षेप करू नये.सर्व आमदार,खासदार,मंत्री, सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यासंदर्भातील भ्रष्टाचाराची प्रकरणे या सरकारने हाताळावीत. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाखालोखाल अधिकार असावेत. आणि या सरकारच्या निर्णयाला केवळ सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे.देशात वा राज्यात जेव्हा आणिबाणीसारखी  परिस्थिती उद्भवेल ,तेव्हा हे सरकार राष्ट्रपतींच्या सल्ल्याने काम पाहील.देशहितासाठी आवश्यक असे कोणतेही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य या सरकारला राहिल. आत्ययिक परिस्थितीत म्हणजे परकीय आक्रमण इत्यादी.त केंद्र,लष्कर आणि  राष्ट्रपती यांच्या सल्ल्याने लष्करास आणि नागरिकांस  योग्य ते आदेश देण्याचा अंतिम अधिकार या सरकारला असेल.मुद्दा क्र. ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे हे सरकार सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर सतत नजर ठेवून असेल.कोणालाही कोणत्याही कारणासाठी वा केवळ वैयक्तीक पक्षहितासाठी सरकारचा पाठींबा काढून घेणे,अविश्वास ठराव मांडणे वगैरे प्रकार करता येणार नाहीत. काही ठोस कारण असल्यास दोषी (पंतप्रधान असेल तरी) लोकांना पदावरून दूर करून दुसऱ्या योग्य व्यक्तीस ते पद (मग ती व्यक्ती विरोधी पक्षाची असली तरी) दिले जाईल. प्रत्येक सरकार आपला नियत कालावधी पूर्ण करेल.आणि अश्या 'मिश्र' सरकारमधील लोकांना केवळ देशहितासाठीच एकत्र राहून काम करावे लागेल. यामुळे नालायक सत्ताधिशांना चपराक बसेल आणि एकाच पक्षाची 'मक्तेदारी' किंवा घराणेशाही वगैरे प्रकार संपुष्टात येतील.आणि चांगले आणि प्रामाणिक नेते लाभतील.

११) बोगस नोटा आणि काळ्या पैशाला आळा कशाप्रकारे घालता येईल?
अ) १०००,५००,१०० व ५० रु.च्या  नोटांचा रंग बदलण्यात यावा.
ब) जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ६ महिने कालावधी देण्यात यावा.
क) हा कालावधी उलटून गेल्यानंतर येणाऱ्या नोटा(त्यांची नोंद घेऊन) जप्त करून  व्यवहारातून बाद कराव्यात.या बाद ठरविलेल्या नोटांच्या रकमेइतके नवीन चलन छापून त्याचा विनियोग जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी करावा.
ड) नोटा बदलून देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रत्येक गावात,शहरात,जिथे कुठे कोणतीही बँक असेल अश्या ठिकाणी केवळ  नोटा बदलून देण्यासाठी आपली कार्यालये सुरु करावीत,आणि सर्वसामान्यांना (रांगेत उभे न करता) त्वरित नोटा बदलून द्याव्यात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांची केवळ ह्या कामासाठी नियुक्ती करावी.त्यासाठी त्यांना योग्य ते वेतन देण्यात यावे.या वेतनाची व्यवस्था जप्त केलेल्या नोटांच्या रकमेतून करावी.
इ) दरवर्षी सरकारने नवीन नोटांची आवृत्ती काढावी आणि त्यास दोन वर्षांची व्ह्यालीडीटी असावी. व्ह्यालीडीटी संपलेल्या नोटा जप्त कराव्यात. आणि तेवढ्या किमतीचे नविन चलन छापावे.
ई) ही प्रक्रिया सतत सुरु ठेवावी .
यामुळे किमान ५०% काळा पैसा बाहेर येईल;आणि जो आला नाही,तो व्यवहारात चालणार नाही.
उ)  ५०००/-वरील सर्व खासगी व सरकारी व्यवहार चेकने करणे बंधनकारक करावे.
                                                                                                            

Wednesday, March 9, 2011

तत्वज्ञानाची शिबिरे आणि भाविकांची मानसिकता

    सध्या भारतीय तत्वज्ञानाला ग्लामर आलेले आहे.अगदी विदेशातूनही भाविकांचा लोंढा भारतीय तत्वज्ञानाच्या ओढीने वेळ आणि पैसा खर्च करून भारतात येतात आणि इथे चार सहा महिने राहून तत्वज्ञानाचे,संस्कृतीचे,योगाचे वगैरे  धडे घेतात.काही प्रसिध्द तत्वज्ञानी लोक विदेशात भारतीय तत्वज्ञानाची शिविरे घेतात.एका अर्थी ही फार चांगली गोष्ट आहे.अर्थात ज्यांना खरोखर तत्वज्ञान म्हणजे काय,हे मनापासून शिकायचं असेल,त्यांच्यासाठी! पाश्च्यात्य संस्कृतीला भारतीय तत्वज्ञानाची भुरळ तशी फार जुनी आहे.आणि ते लोक भारतीय लोकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करताना दिसतात.त्यांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन ते त्यातून वैज्ञानिक सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.त्याचा वापर स्वता:च्या आणि इतर लोकांच्या उपयोगासाठी करतात.किंवा स्वता;तील काही विशेष कौशल्यात भर घालतात.

       केवळ एक उदाहरण म्हणून सांगतो- मागे डिस्कवरी च्यानेलवर 'डेविड ब्लेन' याचे कार्यक्रम आपण बघितले असतील. हा मनुष्य जादूगार आहे.नाना करामती करतो. तो कधी शेकडो मीटर उंच चबुतऱ्यावर फक्त पाय ठेवण्याइतक्या जागेत तासनतास  उभा राहतो.तो बर्फाच्या लादीत स्वता:ला बंदिस्त करून घेतो.मागे एकदा त्याने १८ मिनिटे पाण्याखाली श्वास रोधून काढली.हे त्याला विशिष्ट योग पद्धतीच्या सततच्या अभ्यासामुळे शक्य झाले.कोणत्याही कारणामुळे  सामान्यता: ५ ते ७ मिनिटे श्वास रोधला गेल्यास आणि असा रुग्ण वा मनुष्य त्वरित वैद्यकीय मदत मिळून यागायोगाने वाचल्यास तो पुढे जगला तरी त्यास मेंदूस कायमस्वरूपी हानी  निर्माण झाल्यामुळे तो जिवंतपणी मरणयातना भोगतो.तो मुकबधीर,वा वेडा होतो.त्याला फिट्स येतात वगैरे पण डेव्हिड ब्लेनला असे काही होत नाही.त्याची तीव्र इच्छाशक्ती,आणि धाडसी वृत्ती त्याचं त्याच्या प्रत्येक साहसात रक्षण करतात.
        आता आपण आपल्या भारतीय लोकांचं बघुयात.इथे अनेक चांगली शिविरे भरवली जातात आणि त्याची फी वगैरे अगदी नाममात्र असते उदा. आर्ट ऑफ लिव्हिंग,ह्याप्पी थॉटस्,स्वाध्याय,रामदेवबाबा ,डॉ.स्नेह देसाई  वगैरे. मी स्वत: ही शिविरे अनुभवली आहेत.ज्यांना तत्वज्ञानात रुची असेल,त्यांनी जरूर जायला हवं असे मी म्हणेन.याशिवाय इतरही अनेक प्रकारची शिविरे असतात ज्यात बाबा ,बुवा आणि भोंदुगिरी चालते! त्या लोकांची नावे मी सांगत नाही कारण ती आपणास माहित असतीलच. तिथे ज्यांना जायचे त्यांनी अवश्य जावे (आपण जाऊ नका सांगीतले म्हणून कुणी ऐकेल असा माझा विश्वास नाही )तर ते असो.
            तर बऱ्याच  चांगल्या शिविरांत(इथेही मी आता कुणाचही नाव न घेता सर्वसामान्यपणे बोलत आहे) मी पाहिलं -खूप काही घेण्यासारखं निश्चितपणे असतं !पण इथे जमणारे सारेच लोक(काही सन्माननीय अपवाद वगळून) ते ज्ञान घेण्याच्या लायकीचे असतात का? असा माझा प्रश्न आहे!माझ्या मते ९०% लोक काही वैयक्तीक हेतू साध्य करण्यासाठी इथे येतात.त्यात विमा एजंट असतात,कुणी खाजगी क्लासेस वाले असतात.कुणाचा काहीतरी व्यवसाय असतो,आणि त्यांना ओळखी निर्माण करून तो वाढवायचा असतो ! कुणी कॉलेजचे विद्यार्थी असतात ते या निमित्ताने आपल्या मित्र मैत्रिणींना भेटायला येतात.,कुणी निव्वळ टाईमपास करण्यासाठी येतात.कुणी नाहीच काही तर एखाद्या अश्या ग्रुपशी नाव जोडलं गेल्यामुळे थोडी प्रतिष्ठा लाभते म्हणून येतात.कुणी आपणास तत्वज्ञानात किती गती आहे हे दाखवण्यासाठी येतात.इथे खरे भाविक फारच थोडे असतात.बहुतांशी लोक आपले क्षुद्र स्वार्थ साधण्यासाठी येतात.हे बऱ्याच लोकांना  समजते पण उघडपणे ( कदाचित स्वत:ही तसेच असल्यामुळे  ) कुणी काही बोलत नाही.
       वर्षानुवर्षे तत्वज्ञानाची शिविरे होत राहतात.बहरत जातात.भाविकांची आणि भुरट्या ,भामट्यांचीही संख्या वाढत जाते.आपले काम साधून झाले की हे लोक हळूच पळ काढतात कारण त्यांना आता अश्या शिबिरांसाठी वेळ नसतो. मात्र त्यांची जागा घेणारे दुसरे धूर्त लोक त्या जागी येतात आणि आधीच्यांची कमतरता भरून काढतात.आणि  जगण्याचे हे आधुनिक तत्वज्ञान सर्वत्र झपाट्याने पसरत राहते.त्यात खरी तत्वे आणि भाविक मध्येच कुठेतरी हरवून जातात.